जायकवाडी प्रकल्पाच्या मराठवाडय़ाच्या न्याय्य हक्काचा पाणी वाटा मिळावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने  सोमवारी (दि. २२) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
संपूर्ण मराठवाडय़ासाठी वरदान ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या भागात लहान मोठी धरणे बांधून हे पाणी अडविले गेले. त्यामुळे जायकवाडीत मोठय़ा प्रमाणावर पाणी येत नाही. जलसंपत्ती अधिनियमानुसार नदी खोऱ्यातील पाणीवाटप तरतुदीनुसार पाण्याची तूट समप्रमाणात विभागली जावी, तसेच सर्व धरणांना समान पाणीवाटप करण्यात यावे, अशी तरतूद असताना शासन मात्र कायद्याची अंमलबजावणी करीत नसल्याने मराठवाडय़ासह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर भविष्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असे शिवसेनेच्या वतीने आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
परभणीत उद्या होत असलेल्या या आंदोलनात आमदार संजय जाधव यांच्यासह शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, खासदार गणेश दुधगावकर, आ. श्रीमती मिरा रेंगे, भाजपप्रदेश चिटणीस विजय गव्हाणे,  जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे आदींसह  परभणी मार्केट व्यापारी असोसिएशन, परभणी शहर बियाने औषधी खत विकेता संघटना यांचाही पाठींबा राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने माणिक पोंढे, रामप्रसाद रणेर, गजानन देशमुख, मारोती बनसोडे आदींनी केले आहे.