स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तसेच सदुभाऊ खोत व इतरांच्या अटकेच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील साळमुख चौकात दीड तासाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी एका एस. टी. बसच्या काचा फोडण्यात आल्या. अकलूज येथेही एसटी बसगाडय़ांवर दगडफेक करण्यात आली.
राजू शेट्टी व सदुभाऊ खोतांच्या अटकेच्या वृत्ताने तालुक्यातील शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तालुक्यातील वेळापूर, नातेपुते,अकलूज, माळशिरस या प्रमुख शहरांबरोबरच सर्व साखर कारखान्यांवर बंदोबस्त सकाळपासूनच वाढवला होता. सकाळी १० वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साळमुख येथील इंदापूर- सांगोला व सातारा-पंढरपूर या चौकात रास्ता रोको आंदोलन झाले.
सुमारे दीड तास हे आंदोलन चालले. त्याठिकाणी एका एस. टी. बसच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेमुळे संवेदनशील असणाऱ्या वेळापूर या ठिकाणी दंगल काबू पथक मागवण्यात आले. शिवाय वेळापूर, साळमुख, तोंडले या गावाकडून अकलूज व पुढे इंदापूरकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात येत होते.
संवेदनशील वेळापुरातील सर्व व्यवहार व वाहतूक सुरळीत सुरू होती. अकलूज येथेही एसटी बसगाडय़ांवर दगडफेक करण्यात आली.