महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा हंगामाच्या अखेरीस फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाल्यामुळे पक्षीप्रेमी बुचकळ्यात पडले आहेत. दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला येणाऱ्या या पक्ष्यांनी यंदा अखेरच्या टप्प्यात अभयारण्यात येणे पसंत केले. दुसरीकडे दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत असली, तरी या ठिकाणी मूलभूत सुविधांअभावी पक्षीप्रेमींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दरवर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान आशिया, अफ्रिका खंडातून पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल होत असतात. यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी व मुबलक खाद्य असल्यामुळे त्यांचा मुक्काम नेहमीपेक्षा काहीसा वाढला आहे. सध्या अभयारण्यात दाखल झालेल्या रोहित पक्ष्याने पर्यटकांवर मोहिनी घातली आहे. उंच पाय, लांब चोच, लाल पंखांचा हा पक्षी सर्वाचे लक्ष वेधून घेतो. अफ्रिका खंडात तो ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ नावाने ओळखला जातो. हवेत उडताना रोहित लाल पंखांमुळे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे दिसतो. त्यामुळे त्याला अग्निपंख नावानेही संबोधले जाते. दरवर्षी येणारे रोहित पक्षी यंदा उशिराने दाखल झाले आहेत. पक्षीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांची संख्या १४ ते १५ असल्याचे सांगण्यात आले. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचे हे येणे अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले. या संदर्भात नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दोन महिन्यांच्या विलंबाने रोहित पक्ष्यांचे आगमन झाल्याचे सांगितले. रोहित पक्षी ज्या भागात प्रथम गेले होते, तिथे त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे त्यांना या ठिकाणी येण्यास नेहमीपेक्षा थोडा विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा अभयारण्यात ‘ब्लॅक स्टॉर्क’ व ‘ग्रेट क्रेस्टेड ग्रीब’ या दोन दुर्मीळ पक्ष्यांचे प्रथमच दर्शन घडले आहे. या शिवाय अभयारण्यात चांदवा, वैष्णव, सुरुची, नफ्टा, चक्रवाल, रंगीत करकोचा, जांभळी पाणकोंबडी, खंडय़ा आदींची गर्दी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील या एकमेव अभयारण्यात पक्ष्यांचा डेरा कायम असला आणि पर्यटकांची त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असली, तरी मूलभूत सुविधांची वानवा आहे. पर्यटकांना पक्ष्यांचे समीप दर्शन घेता यावे म्हणून वन विभागाने ‘जिप्सी’ नामक अत्याधुनिक बोट खरेदी केली होती. त्यावेळी बोटीसमवेत पर्यटकांसाठी खास जॅकेटही आणले गेले. डिझेल व पायाने चालविता येणारी ही बोट जेमतेम महिनाभर पाण्यात फिरली. त्यातही तिचा वापर पर्यटकांऐवजी मासेमारीसाठी अधिक होऊ लागल्याने अखेरीस ती विश्रामगृहावर ठेवण्यात आली. आज या बोटीची दयनीय अवस्था झाली आहे. बोटीसमवेत आणलेले जॅकेटही गायब झाले आहेत.  पक्षी अभयारण्य विकसित करताना वन विभागाने परिसरात कुऱ्हाड बंदी केली. त्यामुळे काही प्रमाणात झाडांची कत्तल थांबली. परंतु, अभयारण्यात परिचय इमारतीव्यतिरिक्त एकही इमारत उभी राहू शकली नाही. पर्यटकांना पक्षी निरीक्षण करण्यासाठी काटेरी झुडपे पार करत नदीकाठावर जावे लागते. पक्षी निरीक्षणासाठी उभारलेल्या मनोऱ्यांच्या अवस्थेविषयी विचारच न केलेला बरा. नदी काठावर कसे जावे हे पर्यटकांना समजत नाही. वन विभागाचा एकही कर्मचारी उपलब्ध नसतो. अभयारण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था नाही. आता हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने स्थलांतरित पक्षी परतीच्या प्रवासाला लागतील. पुढील हिवाळ्यात ते पुन्हा अभयारण्याकडे परततील. मात्र पक्षी निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या समस्या प्रारंभापासून ‘जैसे थे’ राहिल्या आहेत.