ऐन दिवाळीत घामाचा दाम मागणाऱ्या बळीराजावर वामनरूपी सरकारने गोळीबार करून बळी घेतला, त्याचा निषेध जिल्हाभरात होत आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी या कृतीचा तीव्र निषेध केला.
सन २०१२-१३च्या हंगामात उसाला ३ हजार रुपयांची पहिली उचल व अंतिम भाव ४ हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून उसाचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र, यात सरकार हस्तक्षेप करणार नाही, अशी आडमुठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. कारखानदारांनी व सरकारने भाव ठरवावा, असे जाहीर केले. मात्र, साखर उद्योग सरकारच्या नियंत्रणात ठेवला गेला आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे. मात्र, हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने पोलीस पाठवले व गोळीबाराचा आदेश दिला. गोळीबारात ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला दोन शेतकऱ्यांच्या प्राणावर बेतले. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध म्हणून दिवाळी साजरी करणार नाहीत, असे पत्रकात म्हटले आहे. रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी पाटील येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने प्रा. डॉ. विठ्ठल मोरे यांनी गोळीबाराचा निषेध केला. सरकारने आंदोलकांशी तात्काळ चर्चा करावी व यातून मार्ग काढावा, अशी मागणी केली.