गडकोट संवर्धनार्थ स्थापन झालेल्या येथील शिवकार्य गडकोट मोहिमेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दिला जाणारा ‘सह्याद्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुण्यातील पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात १६ मार्च रोजी संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गडकिल्ल्यांचा उज्ज्वल इतिहास आहे. राज्यातील बहुतांशी गडकिल्ले नाशिक जिल्ह्यातच आहेत. या गडकिल्ल्यांची सध्याची स्थिती दयनीय आहे. गडकिल्ल्यांच्या रूपातील इतिहासाचा अमूल्य ठेवा जतन व्हावा, त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी शिवकार्य गडकोट मोहीम ही संस्था कार्य करीत आहे. किल्ल्यांची पडकी तटबंदी, ढासळलेले बुरूज, जमीनदोस्त झालेले चिरेबंदी वाडे, बुजलेले भुयारी मार्ग यांच्या डागडुजीसह गडकिल्ल्यांवर पर्यटकांकडून टाकण्यात येणारा प्लास्टिक कचरा जमा करणे, तळ्यांची साफसफाई करणे असे काम या संस्थेचे कार्यकर्ते करीत असतात. गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी, संवर्धनासाठी समाजाने योगदान देण्याची गरज आहे. शिवकार्य गडकोट मोहिमेने नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी श्रमदानाच्या १० मोहिमा पूर्ण केल्या आहेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासह पशुपक्षांचे संवर्धन, आदिवासी दुर्गम भागात उपेक्षित मुलामुलींसाठी सायकल स्पर्धा, शाळाशाळांमध्ये व्याख्यानमाला असे कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक आनंद बोरा, पक्षीमित्र भीमराव राजोळे आदींनी दिली आहे.