डोंबिवली पश्चिम येथील आनंदनगर मैदानात क्रिकेट खेळताना दोन गटांमध्ये झालेल्या भांडणातून शनिवारी सकाळी सचिन तिवारी (वय १५) या विद्यार्थ्यांची चार जणांनी निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी येथील आनंदनगर मैदानात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती. हा वाद शनिवारी पुन्हा उफाळून आला. यावेळी सचिनला चार जणांनी बेदम मारहाण केली तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वारही केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिनला वाचविण्यासाठी मध्ये आलेला त्याच्या मित्र रजनीश माळी हा देखील गंभीर जखमी झाला आहे. दोघेही सीएमएस शाळेतील दहावीचे विद्यार्थी आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वालधुनी नाल्यात सापडले अर्भक
कल्याण येथील वालधुनी नाल्यात शनिवारी एका मुलीचे जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या जिवंत अर्भकास कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कल्याण येथील अशोकनगर रेल्वे कॉलनी भागात वालधुनी नदीचे पात्र आहे. या भागात काही तरुणांचा समूह वावरत होता. यावेळी नदीच्या पात्रात एका मुलीचे अर्भक त्यांना आढळून आले. जवळून पाहणी केली असता त्यांना हे अर्भक जिवंत असल्याचे आढळले.
भयभीत झालेल्या तरुणांनी याबाबत लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या अर्भकास ताब्यात घेतले आहे. यास कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.