कायम अवर्षणप्रवण भागात मोडल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे संकट कायम असताना दुसरीकडे याच दुष्काळी जिल्ह्य़ात उसाचे वारेमाप पीक घेण्यात आले आहे. उसासाठी पाण्याचा बेसुमार वापर आला व त्यातून दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उसाच्या शेतीसाठी आता ठिबक सिंचनाचा उपाय एकमेव ठरू लागला आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे कमी पाण्यात उसाचे पीक कसे फायदेशीर ठरते, याचे उत्तम उदाहरण उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ परिसराचे द्यावे लागेल.
बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या पुढाकाराने स्थानिक ऊस उत्पादक शेतक ऱ्यांनी पाण्याची कमतरता असताना ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. बीबी दारफळ परिसरात १३ वर्षांपूर्वी म्हणजे सन २००० च्या सुमारास उसाचे एकूण उत्पादन सातशे मे. टनापेक्षा जास्त नव्हते. परंतु पाण्याची सुविधा नसल्याने उसाची शेती कशी करायची, याचा प्रश्न सतावत होता. पाण्याची कमतरता असताना ऊसाची शेती करायची तर ठिबक सिंचनाचाच एकमेव रामबाण उपाय होता. त्यासाठी लोकमंगल साखर कारखान्याने पुढाकार घेतला. त्यामुळे सद्य:स्थितीत बीबी दारफळ परिसरात ४५० हेक्टर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जात असून त्यासाठी ८० टक्के ठिबक सिंचनाचा वापर झाला आहे. एकरी उतारा वाढत गेला असून एकरी ७५ मे. टनापर्यंत उसाचे उत्पादन होत आहे. लोकमंगल साखर कारखान्याने प्रति एकरी सहा हजारांचे अर्थसाह्य़ केल्याचे लोकमंगल कारखान्याचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी सांगितले.
ठिबक सिंचनाचा आग्रह धरला असता सुरुवातीला शेतक ऱ्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. ठिबक सिंचन केले तर उंदरांकडून ठिबक नळ्या कुरतडल्या जातात. मांजर, कुत्रे, कोल्ह्य़ांचाही त्रास होतो, अशी ऊस उत्पादक शेतक ऱ्यांची तक्रार होती. परंतु पाण्याची कमतरता असताना उसाच्या पिकासाठी एकमेव ठिबक सिंचन हाच पर्याय असल्याचे जेव्हा पटवून सांगितले, तेव्हा शेतकऱ्यांनी सहकार्याचा हात पुढे केला. नंतर या योजनेला प्रतिसाद लाभला. आता या भागात मोठय़ा प्रमाणात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब होत असल्याचे दिसून येते.