फोरम फॉर इन्टिग्रेटेड सिक्युरिटीतर्फे (फिन्स) ‘सरहद को प्रणाम २०१२’ या उपक्रमात विविध राज्यांतील सुमारे ८०० जिल्ह्य़ांमधील १० हजारांपेक्षा अधिक युवकांनी सहभागी होऊन देशाच्या सीमेलगत असलेल्या गावांना भेटी दिल्या. सीमेलगतच्या ४६९ गावांमध्ये जाऊन तेथील स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, देशाच्या सीमेचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणारे जवान, तसेच या गावांतील रहिवासी यांच्याशी या युवकांनी जवळून सुसंवाद साधला. मराठवाडा, खान्देशचा समावेश असलेल्या देवगिरी प्रांतातून सुमारे ९० युवक यात सहभागी झाले होते.
भारत-चीन युद्धाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून देशाच्या रक्षणाबाबत युवकांमध्ये जनजागृती घडवून त्यांना तशी प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा हेतू होता. सीमेलगत असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, अरूणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये जाऊन तेथील जनतेशी, जवानांशी व प्रशासनाशी सुसंवादाची पर्वणी या युवकांनी साधली. सीमेलगत गावांमध्ये दोन दिवस मुक्काम करणे, तेथील दैनंदिन जनजीवनाचा अभ्यास करणे, तेथील समस्या जाणून घेणे आदी बाबी या उपक्रमात समाविष्ट होत्या. युवकांनी मोठय़ा आवडीने व आत्मीयतेने यात सहभाग नोंदविला. देशातील सर्वसामान्य जनता सीमावासीयांसोबत ठामपणे आहे, हा संदेश या निमित्ताने या गावकऱ्यांपर्यंत व लष्करी जवानांपर्यंत पोहोचविण्यात ‘फिन्स’चे कार्यकर्ते यशस्वी झाल्याचे ‘फिन्स’चे संयोजक ललित चौधरी व सहसंयोजक पंडित घुगे यांनी या संदर्भात शुक्रवारी आयोजित पत्रकार बैठकीत सांगितले.
देशाच्या सीमा सुरक्षित असणे हे देशाच्या अखंडतेसाठी सदैव गरजेचे असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सीमाप्रांतातून मिळणाऱ्या माहितीनुसार देशाच्या बहुतेक सीमांसमोर धोका निर्माण झाला आहे. या बाबत सरकार व प्रशासनाला सावध करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग शक्य असल्याचे घुगे यांनी सांगितले.