मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला आज फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर विदर्भात विविध संघटनांतर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनीही कसाबच्या फाशीचे स्वागत केले.
दशहतवादी कसाबला फाशीची देण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र त्याबाबत काहीच निर्णय घेत नव्हते. कसाबने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देऊन त्याचे दफन करण्यात आल्याची बातमी कळल्यावर शहरातील विविध भागात जल्लोष करण्यात आला. मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या मोमीनपुरा आणि हसनबाग परिसरात फेरफटका मारला असता अनेकांना कसाबला फाशीची शिक्षा झाल्याचे माहीत नव्हते. मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सगळीकडे चर्चा होऊ लागली. मोमीनपुरा जामा मशिदीजवळ सकाळी नमाजसाठी आलेल्या अनेक मुस्लिम बांधवांनी कसाबच्या फाशीचे स्वागत करून ‘बहुत लेट कर दिया’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही मुस्लिम बांधवांना कसाबला फ़ाशी दिल्याची माहिती नव्हती. हसनगबागमध्ये सकाळी शांतता होती. अनेक मुस्लिम बांधव कसाबच्या फाशीबाबत चर्चा करीत होते. सक्करदरा चौकात काही मुस्लिम युवकांनी फटाके फोडून कसाबच्या फाशीचे स्वागत केले. लक्ष्मीभवन चौक, प्रतापनगर, नंदनवन, पाचपावली, जागनाथ बुधवारी या भागात जल्लोष करण्यात आला. गोळीबार चौकात माजी महापौर देवराव उमरेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाके फोडून कसाबच्या फाशीचे स्वागत केले.  
 बडकस चौकात बजरंग दलाचे सुबोध आचार्य यांच्या नेतृत्वाखाली फटाक्याची आतषबाजी करून पेढे वाटण्यात आले तर भारतीय जनता पक्षातर्फे झेंडा चौकात जल्लोष करण्यात आला. इतवारीत सराफा ओळ, किराणा बाजार आणि चितारओळ परिसरात मिठाई वाटण्यात आली. व्यापारांनी कसाबच्या फाशीचे स्वागत केले. सकाळी उद्यानामध्ये फिरायला आलेल्या नागरिकांनी कसाबच्या फाशीचे स्वागत करून अन्य दहशतवाद्यांना लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज सकाळी  दर्शनासाठी नागपुरात आल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष न करता कसाबच्या फाशीचे स्वागत केले.    अकोल्यात राजकीय पक्षांनी रस्त्यावर फटाके फोडत आनंद व्यक्त केला. भाजपने नाटय़गृह चौकात फटाके फोडत कसबाच्या फाशीचे स्वागत केले. मनसेने जठारपेठस्थित जिल्हा कार्यालयाच्या समोर फटाके फोडत जल्लोष केला. खुले नाटय़ गृहासमोर भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका विरोधी पक्षनेता हरीश आलिमचंदानी, हरिभाऊ काळे, सुमन गावंडे, लता गावंडे, अजय शर्मा, सारिका जयस्वाल, सतीश ढगे, गिरीश गोखले, धनंजय गिरीधर, टोलू जयस्वाल, आशिष पवित्रकार, राहुल देशमुख, विजय इंगळे यांनी हा जल्लोष केला. मनसेने घेतलेल्या स्वतंत्र कार्यक्रमात जिल्हाप्रमुख विजय मालोकार यांच्या नेतृत्वाखाली सौरभ भगत, रणजित राठोड, अरविंद शुक्ला आदींचा समावेश होता.
बुलढाण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था करण्यात व्यस्त होते. त्यांनी कसाबच्या फाशीबद्दल योग्य निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. कसाबच्या फाशीला विलंब झाला असला तरी देशद्रोह्य़ांना कधीच माफी नाही हे यातून सिध्द झाले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सांगितले.
अमरावतीत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोश केला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ चौकात फटाके फोडले. यावेळी अरूण मोंढे, विजय अहारे, प्रशांत गावंडे, संजू पाटील, राजेश चौबे आदी उपस्थित होते. साईनगर परिसरात भाजपचे नगरसेवक तुषार भातीय यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी केव्हा देणार? असा सवाल तुषार भारतीय यांनी केला. यावेळी चेतन गावंडे, आशीष अडसोड, दिलीप कुळकर्णी, श्याम जोशी, चेतन जाधव आदी उपस्थित होते.   वाशीम जिल्ह्य़ात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश रथ येणार असल्याने शांतता होती. शहरी भागात सकाळचे भारनियमन असल्याने कसाबच्या फाशीचे वृत्त  सकाळी ९ वाजताच्या सुमारास कळाले. तर ग्रामीण भागात हे वृत्त दुपारी पसरले.