देह विक्रय करणाऱ्या व समाजाने टाकून दिलेल्या महिलांच्या उपेक्षित मुला-मुलींचे संगोपन करणाऱ्या स्नेहालय संस्थेतील दोघा मुलींचा विवाह सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा व रितीरिवाजानुसार संपन्न झाला. स्नेहालयातील संस्कार संपन्न मुलींचे कन्यादान करणे हे भाग्याचे असल्याचे उद्गार सोलापूर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) भास्कर थोरात यांनी यावेळी काढले.उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे स्नेहालय संस्था कार्यरत असून या संस्थेने लहानपणापासून संगोपन केलेल्या अमृता हिचा विवाह प्रदीप काकरंबे याचबरोबर तर कोमल हिचा विवाह राजकुमार नरखडे याजबरोबर संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपकुमार शिंगवी, उपाध्यक्ष नंदकिशोर भन्साळी, सचिवा ब्रह्मकुमारी प्रमिलादीदी जाधव, बसवराज शास्त्री हिरेमठ, शंकरराव जामगुंडे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, माजी नगरसेविका अ‍ॅड. करिमुन्निसा बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस बॅन्ड पथकाने सुमधुर संगीतगाणी वाजवून या विवाह सोहळ्याची शान वाढविली. संस्थेने आतापर्यंत पन्नास मुलींचे विवाह लावून दिले आहेत.