विदर्भात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत ५.४ अंश सेल्सिअस झाली आहे.
या खालोखाल नागपूरचे किमान तापमान ८.१ व यवतमाळचे ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आठवडाभरापासून विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे.
विदर्भात तापमानदर्शक यंत्रातील पारा दिवसेंदिवस खाली घसरत आहे. हुडहुडी भरावी एवढी थंडी आता आहे. ब्रह्मपुरी, नागपूर व  यवतमाळ शहरांचे कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते नऊ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.
अकोला कमाल २९, किमान १२.४ अंश से., अमरावती कमाल २७.६ व किमान १२.२ अंश से., चंद्रपूर कमाल २९ व  किमान १२ अंश से, वर्धा २९ व १०.६, वाशीम २८ व १२.६, गोंदिया येथे  २५.१ व ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
चौकाचौकात शेकोटय़ा पेटवून आणि गरम कपडे घालून नागरिक थंडीपासून बचाव करीत आहेत.
पुढील २४ तासात कमाल तापमान २८ व किमान १० अंश सेल्सिअस राहील, असा      अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.