भाऊराव देवरस यांच्या विचारांचे सार हा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आणि दिशा देणारे आहे. त्याचा सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रत्येकाने उपयोग करून व मनात असलेला भारत घडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
भाऊराव देवरस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदरांजली कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विश्वास पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विकासासाठी नैसर्गिक साधनांपेक्षा व्यक्तींवर संस्कार केल्यास समाज सहजतेने सर्वागी सुदृढ बनून भारत सर्व पातळीवर सक्षम होऊ शकतो असे राष्ट्रवादी विचार भाऊराव देवरसांचे होते.
त्यांनी आपली शेती शेतमजुरांना दान दिली तर बँकेतील पैसा हा समाजपयोगी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला. सामाजिक दायित्व, भावना हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरीत होऊन त्याकाळी अनेकजण समाज कार्यात सहभागी झाले व त्यांनी भारतीय राजकारणात मोलाचे योगदान दिले. भाऊराव देवरस आणखी २० वर्ष आयुष्य जगले असते तर समाजात निराळे चित्र दिसून आले असते. याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
 विश्वास पाठक यांचे यावेळी भाषण झाले. प्रा. योगानंद काळे यांनी प्रास्ताविक तर शिरीष भगत यांनी संचालन केले. नरेंद्र जोशी यांनी आभार मानले. भाऊराव देवरस प्रतिष्ठानतर्फे रक्तदान आणि डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शिबिराचे उद्घाटन केले.