कर्नाटकातील देवदासीच्या पोटी जन्मलेल्या एका मुलीची ही कहाणी आपल्या आयुष्यासारखी लेकीचीही परवड नको म्हणून ही आई, मोल-मजुरी करून मुलीला शिकविण्याचा निर्णय घेते. लहानपणापासून आपल्या आईचे कष्ट पाहात असलेली ही मुलगी, आपल्या हुशारीच्या जोरावर शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण करते. पुढे एका कामाच्या निमित्ताने ही मुलगी दिल्लीत येते. त्याचवेळी परदेशात पीएचडीसाठी शिष्यवृत्तीच्या जोरावर आपली निवड झाल्याचे तिला समजते.

ही बातमी समजताच स्वत: त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. आयुष्यातल्या कष्टमय प्रवासाचा शेवट इतका सुखद व्हावा, यासारखे दुसरं सुख नाही. पण कदाचित नियतीला हे मान्य नसावे. वडिलांचे नाव नाही, या छोट्याशा कारणामुळे तिचा पासपोर्ट नाकारला गेला. आणि क्षणातच, आतापर्यंत मिळविलेल्या यशावर पाणी फेरले गेले.

ही कहाणी आहे, नारी कामाक्षी या तरुणीची. २०२३ मध्ये नारीची एका पीएचडी उपक्रमासाठी शिष्यवृत्तीच्या जोरावर निवड झाली. पासपोर्ट तयार करण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि गुणपत्रिका घेऊन ती पासपोर्ट कार्यालयात गेली. सर्व कागदपत्रांची शहानिशा केल्यावर तिला पासपोर्ट मिळणार नाही असे सांगण्यात आले. या नाकारण्यामागचे कारण विचारताच, वडिलांचे नाव माहीत नसणे, असे कारण देण्यात आले. आपण एका देवदासीची मुलगी असून,त्या साठी जे सरकारी प्रमाणपत्र आवश्यक असतं, ते सादर करूनदेखील पासपोर्ट कर्मचाऱ्यांनी त्याची आवश्यक ती दखल घेतली गेली नाही. उलट वडिलांचे नाव माहीत नाही, हा मुद्दा उचलून धरत तेथील कर्मचाऱ्यांकडून अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली.

नारी जेव्हा त्या कार्यालयातून बाहेर पडली तेव्हा पार कोलमडून गेली. तिचे रडणे काही थांबतच नव्हते. आयुष्याविषयीच्या साऱ्या अपेक्षा मावळताना दिसत होत्या. कर्नाटकातील एका छोट्याशा गावात इतर मुलींप्रमाणे नारीच्या आईलादेखील कोवळ्या वयात देवदासी म्हणून कामाला जुंपण्यात आले. जेव्हा नारीचा जन्म झाला, त्यावेळेला आपल्या मुलीची आपल्यासारखी परवड होऊ नये म्हणून तिच्या आईने मोल-मजुरी करून तिला शिकवायचे ठरविले. नारीदेखील लहानपणापासून आईचे कष्ट पाहात होती. त्यामुळे तीदेखील शिक्षणाकडे गंभीरपणे पाहात होती.

मुळातच हुशार असलेल्या नारीने ,यशस्वीरित्या आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने शैक्षणिक क्षेत्रात नोकरी स्वीकारली. तरुणांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, उपक्रम आयोजित करण्यात ती मग्न झाली. सहज म्हणून पीएचडीसाठी अर्ज केला आणि त्यात शिष्य्वृत्तीच्या जोरावर तिची निवड देखील झाली. आता सारं काही सुरळीत होणार, असं आशादायक चित्र दिसत असतानाच केवळ वडिलांचे नाव नाही म्हणून तिला पासपोर्ट नाकारला गेला.

सुरुवातीला खचलेल्या नारीने आता याविरोधात लढायचे ठरविले. आपली बाजू मांडीत पार दिल्लीपर्यंत पोहोचली. दरवेळी प्रत्येक ठिकाणी वडिलांचे नाव हाच मुद्दा उफाळून वर येत होता. एकल स्त्री पालकाची मुलं आपल्या नावाच्या पुढे आईचे नाव लावू शकतात, या उच्च न्यायालयाने संमत केलेल्या निर्णयाविषयी देखील अधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा पोलीस पडताळणीच्या तांत्रिक बाबींमध्ये हा पासपोर्ट नाकारला जाऊ शकतो, असे तिला सांगण्यात आले. आणि झालेही तसेच. नियमित पासपोर्ट पेक्षा तत्काळ पासपोर्टवर देखील तिने अर्ज करून पहिला. पण तिथंदेखील हाच मुद्दा आड आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा लढा लढत असताना नारीला एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली की, एक व्यक्ती जर स्त्री आणि दलित जमातीतील असेल शिवाय एकल असेल, तर अशा स्त्रियांची सरकारी कागदोपत्री दखल घेणं हे तितकसं जरुरी समजलच जात नाही. निव्वळ मीच नाही, तर माझ्यासारखी अनेक अशी दलित लोकं आहेत, ज्यांची क्षुल्लक कागदपत्रांअभावी स्वप्नेच जळून गेली आहेत. जग बदलतय. जाती-पातीपेक्षा अंगभूत गुणांना महत्त्व आलंय. या गोष्टी ऐकायला खूप चांगल्या वाटतात, पण प्रत्यक्षात वास्तव मात्र खूप विखारी आहे.गेल्या दोन वर्षापासून नारी पासपोर्ट मिळविण्यासाठी लढत आहे. यासाठी तिने अनेक अधिकारी स्तरावरील लोकांशी पत्र,ई-मेलव्दारे संपर्क साधत आहे. अखेर दोन वर्षाच्या चिवट झुंजीनंतर काही दिवसांपूर्वीच तिच्या पासपोर्टला मान्यता देण्यात आली. आणि उन्मळून पडलेली स्वप्ने पुन्हा एकदा फुलण्यासाठी उभारू लागली आहेत.
सुचित्रा प्रभुणे
suchup@gmail.com