पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे  मल्टिप्लेक्स सिनेमागृहांत लावण्यास मनसेने विरोध केला आहे. त्यांची खळ्ळखटय़ाक शैली पुन्हा सुरू राहील, पण पालिका निवडणुकांवर डोळा ठेवून केलेल्या विरोधातच विरोधाभास आहे.

आगामी निवडणुका पाहून विरोध

निवडणुकीच्या तोंडावर सगळेच राजकीय पक्ष स्टंटबाजी करत असतात. त्याचाच हा एक भाग आहे. भारत-पाक सबंध बिघडल्यामुळे ‘मनसे’चा पाक कलाकारांना होणारा विरोध हा जितका योग्य आहे तेवढेच आपल्या देशातील मल्टिप्लेक्स मालकांना धमकावणे हे अयोग्य आहे. शिवाय दिग्दर्शक करण जोहर यांनी पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर हा विरोध थांबणे अपेक्षित आहे. मात्र जोहर यांना समजून न घेता निव्वळ राजकीय स्वार्थापायी विरोध करणे ही भूमिका चुकीची आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याची भूमिका योग्य असली तरी त्याचा परिणाम आपल्या देशातील चित्रपटांवर आणि त्यांचा निर्मितीवर होत असेल तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अगामी निवडणुका तोंडावर आल्यानेच हा विरोध जास्त होत आहे.

ओमकार मयेकर, विद्यालंकार महाविद्यालय

 

खळ्ळखट्टय़ाक भूमिकाच योग्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने पाकिस्तानी कलाकारांवरून सध्या मल्टिप्लेक्सच्या विरोधात घेतलेली भूमिका मला योग्य वाटते. उलट पाकिस्तानने भारतावर केलेल्या आजवरच्या कारवाया लक्षात घेता प्रत्येक भारतीय नागरिकाने पाकिस्तान विरोधी पवित्रा घेणे आवश्यक आहे. सर्व स्तरातूनच पाकिस्तानला विरोध होणे सध्या अपेक्षित आहे. जर मनसेने पाक कलाकारांनी काम केलेल्या चित्रपट प्रदर्शनांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली नाही तर यापुढेही ते आपल्याला ग्राह्य़ धरतील.

तन्मय शिरोडकर, शासकीय तांत्रिक महाविद्यालय

 

दहशत माजवण्यात स्वारस्य

मनसेने मल्टिप्लेक्स विरोधात सध्या घेतलेली भूमिका न पटणारी आहे. भारतीय लोकशाहीत कोणीही कोणाला रोखू शकत नाही. त्यामुळे केवळ दहशत निर्माण करण्यासाठी मनसेने केलेली ही मुजोरीच आहे. याचे परिणाम आपल्याच इथल्या मल्टिप्लेक्स मालकांना सहन करावे लागतील. तसेच या मल्टिप्लेक्स विरोधाचा पाकिस्तानी कलाकारांना नव्हे तर आपल्याच देश बांधवाना त्रास होणार असून त्यांचेच व्यावसायिक नुकसान होणार आहे. शिवाय एक पडदा चित्रपट गृहांनी धरलेली मनसेची वाट, हीदेखील केवळ मनेसेने धमकावल्यानेच घेतली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

तेजश्री परब, साठय़े महाविद्यालय

 

मनसेच्या विरोधात विरोधाभास

चित्रपट निर्मितीच्या वेळेस भारत-पाकिस्तान यांमध्ये संघर्षांची पाश्र्वभूमी नव्हती असे करण जोहर यांनी स्पष्ट केले आहे. तरीही केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मल्टिप्लेक्स मालकांना चित्रपट बंदीसाठी धमकावणे ही मनसेची जुनी रणनीती आहे. या उलट पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने घुसून केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईसंबंधी भारतीय कलाकार आणि दिग्दर्शकांनी केलेल्या विरोधी वक्तव्यांवर त्यांनी विरोध दर्शवणे अपेक्षित आहे. पण त्यांच्याकडून ज्याला विरोध करणे गरजेचे आहे त्याला विरोध न करता ते भलतेच काहीतरी धरून बसल्याचे दिसत आहे.

निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय