महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात देशांतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/ नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व अनुसूचित जाती/ नवबौद्ध असावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ४.५० लाख रु. असावी. अर्जदार संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांला शिकत असावेत. विद्यार्थ्यांनी १० वी व १२ वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा राज्यातील अन्य परीक्षा मंडळाकडून उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी १२ वी व सीईटी प्रवेश पात्रता परीक्षेत ५५% तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेमध्ये ५०% गुण मिळविले असावेत. शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- योजनेअंतर्गत पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून १०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी निवड करण्यात येऊन त्यांना खालीलप्रकारे फायदे उपलब्ध होतील. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय व संगणक शुल्क. शैक्षणिक संस्थेतील वसतीगृह व भोजन शुल्क. संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास संस्थेने आकारलेले वसतिगृह व भोजन शुल्क. शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर शैक्षणिक खर्चापोटी वार्षिक १०,००० रु. अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या www.maharashtra.gov.in/ career, अथवा www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी अथवा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय- महाराष्ट्र राज्य ३, चर्च पथ, पुणे- ४११००१ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६ आहे.