लहानपणी आम्ही तुळशीबागेतून आणलेल्या एकात एक असलेल्या सहा बाहुल्यांशी खेळायचो. देहाची संकल्पना साधारण या बाहुल्यांशी मिळतीजुळती आहे. व्यक्ती स्तरावर हे कोश आतून बाहेर अभ्यासायचे आहेत; परंतु आंतरिक जाणिवेच्या स्तरावर बाहेरून आत असे अभ्यासले तरी चालेल.
आपले शरीर आहे तरी कसे? त्याचा निर्माता कोण? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे ऋषीमुनींना त्यांच्या साधनेच्या दिव्यावस्थेत स्फुरली. आम्हाला दिसणारा देह हा आमच्या अस्तित्वाचा केवळ एक स्तर झाला. त्याला त्यांनी नाव दिले अन्नमय कोश. हे झाले भौतिक शरीर. आधुनिक वैद्यकशास्त्र भौतिक शरीरावर उपचार करते. या शरीराला चालविणारे असते ते ‘प्राणिक’ शरीर अर्थातच प्राणमय कोश. प्राणशक्तीची तुलना वायर्समधून वाहणाऱ्या विजेशी केली जाते. पण प्राणशक्ती म्हणजे रक्त (blood) अथवा नसा (nerves) नाही. प्राणमय कोशाच्या पलीकडे असते ते मनोमय शरीर अथवा मनोमय कोश. याला चांगले-वाईट कळते, पण वळत नाही.  त्यापलीकडे आहे तो विज्ञानमय कोश. इथे योग्य काय, अयोग्य काय, हे खरे ‘ज्ञान’ मिळते. या कोशात अंतिम सत्य जाणण्याची क्षमता आहे.
आनंदमय कोश म्हणजे खरीखुरी निखळ आनंदावस्था! याचा लौकिक जगतातील सुख-दु:खाशी काहीही संबंध नाही. संत तुकारामांनी अनुभवलेली ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हीच ती अलौकिक भावावस्था. परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती यापलीकडे ‘आत्ममय’ कोशाचे अस्तित्व मानतात. आपली आनंदयात्रा अन्नमय कोशाकडून आत्ममय कोशाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणिवेकडून नेणिवेकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे अपेक्षित आहे.
प्राणायाम
प्राणायाम साधना प्राणमय कोशासाठी आहे. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज श्वासावरील जाणिवेचा अभ्यास करू या.
 सहज सुखासनात बसा. डोळे शांत मिटून घ्या. पाठकणा समस्थितीत असेल. लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करा. श्वास घेताना नाकपुडय़ांना हवेचा होणारा थंडगार स्पर्श व श्वास सोडताना नाकापुढेही काही बोटे जाणवणारी उबदार हवा याकडे लक्ष एकाग्र करा. ही झाली सहज श्वासाची सहज जाणीव! ही जाणीव सजगतेने घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा.
साधारण १५ ते २० वेळा हा सराव करा.
खा आनंदाने! : सूर्य उगवला, प्रकाश पडला..
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
   कधी तरी जुनी गाणी आठवतात आणि आपण लगेचच गुणगुणायला लागतो. आजच्या लेखाचं शीर्षकही असंच गाण्यावरून सुचलेलं; पण कारण वेगळं आहे. आज-काल आपण ‘व्हिटॅमिन डी’विषयी खूप ऐकतो. लहान वयापासूनच ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आढळते. पाठदुखी/ कंबरदुखीसाठी आता साठी ओलांडायची गरज नाही. रक्तातील ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी तपासायची आणि कमी असल्यास औषधं चालू करायची हे ठरलेलंच. आता मनामध्ये विचार येतो की अचानक कशी कमतरता जाणवायला लागली? पूर्वी तर कॅल्शियमची कमतरता म्हणून हाडं दुखतात आणि योग्य आहारातूनच हाडांची झीज थांबवू शकत होतो. आता अचानक ‘व्हिटॅमिन डी’ कुठून आलं? अचानक नाही, पण आता संशोधनातून कळलंय की वयाप्रमाणे हाडं ठिसूळ होतात/ हाडांची झीज होते, त्यासाठी कॅल्शियमबरोबर ‘व्हिटॅमिन डी’ची सुद्धा गरज असते. स्त्रियांच्या हाडातून कॅल्शियमची कमी व्हायला सुरुवात होते ती साधारण ४० वयाच्या आसपास. बरं इतर वयामध्ये प्रदूषणामुळे आणि सकाळचं कोवळं ऊन न मिळाल्यामुळे कमतरता जाणवू शकते. करायचं काय? आपल्याला कॅल्शियम जर योग्य आहार असेल तर मिळतंच, पण ते हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ची गरज लागते. आणि वयानुसार आहार पूरक नसेल तर ‘गोळ्या’ घेण्याची गरज असते, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार!
दूध, दही, पनीर, पालक, भेंडी, सोयाबीन, बदाम, मोहरीचा पाला, खजूर, अंजीर, जर्दाळू, कोबी, भोपळ्याच्या बिया, राजगिरा, तीळ, नाचणी, राजमा, संत्र, कुळीथ वगैरे पदार्थामधून मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळतं. मात्र रोज हे पदार्थ कोणत्या न कोणत्या रेसिपीमध्ये जरूर वापरावेत. उदा. पिठामध्ये सोयाबीन/ कुळीथ/ राजगिरा पीठ घालावं. भाजीमध्ये तीळ किंवा तीळकूट घालावे/ मधल्या वेळी ड्रायफ्रुट्स खावेत/ डाळीमध्ये पालक वापरावा/ दूध किंवा दुधाचे पदार्थ सोसतील तसे रोज खावेत. सकाळचं कोवळं ऊन शक्य असेल त्या वेळी अंगावर घ्यावं.
 आपल्या भारतीय स्वयंपाकामध्ये आपण बऱ्याच रेसिपी बनवू शकतो. उदा. ताकातला पालक, दह्यातील भेंडी, तीळ-कढीपत्ता चटणी, राजगिरा लाडू, सोयावडीची भाजी, कोबीची पचडी, दुपारचा खाऊ  म्हणून मूठभर ड्रायफ्रुट्स, कुळीथ सूप, तीळ-पालेभाजी घालून नाचणीची भाकरी वगैरे सातत्य आणि योग्य प्रमाण जरुरी आहे.  
तीळ  चटणी
साहित्य- ५० ग्रॅम तीळ, १ छोटा चमचा जिरे, १/२ चमचा धणे, काही कढीपत्त्याची पाने, १ छोटा चमचा उडीद डाळ, ६ संपूर्ण कश्मिरी लाल मिरच्या, १ वाडगा किसलेले सुके खोबरे, चिंच आणि गूळ.  
पद्धत- सर्व साहित्य कोरडं भाजून घेऊन वाटून घ्यावं. झाली चटणी तयार.
पथ्येसती गदार्तस्य किं औषधे निषेवण:।
पथ्येऽसती गदार्तस्य किं औषधे    
निषेवण:।।
म्हणजेच योग्य आहाराने आरोग्य शाबूत राहातं आणि अनारोग्यात औषधांच्या जोडीला योग्य आहाराची साथ दिली तर आरोग्य लवकर प्राप्त होतं!संगणकाशी मत्री : ओळख ‘यू टय़ूब डाऊनलोडर’ची
आजी-आजोबा आपण मागील लेखात ‘यू टय़ूब’चे फायदे व माहिती पाहिली. या भागात आपण ‘यू टय़ूब’चा वापर कसा करायचा, ते आपल्या संगणकात कसे ‘लोड’ करायचे याची माहिती घेणार आहोत. ‘यू टय़ूब’ वापरण्यासाठी ‘यू टय़ूब डाऊनलोडर’ हे सॉफ्टवेअर संगणकात असणे खूप महत्त्वाचे आहे. ‘यू टय़ूब डाऊनलोडर’ आपल्या संगणकात ‘लोड’ करण्यासाठी गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन ‘डाऊनलोड यू टय़ूब डाऊनलोडर’ वा download youtube downloader असे टाइप करा. आता आपल्यासमोर सुरू झालेल्या पर्यायांपकी एक पर्याय निवडा. या सॉफ्टवेअरला वायटीडी सॉफ्टवेअर असेदेखील म्हटले जाते. कमाल १० ते १५ मिनिटांत हे सॉफ्टवेअर संगणकात ‘डाऊनलोड’ होते. हे सॉफ्टवेअर वापरण्याकरता कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही.
  सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यानंतर आपल्यासमोर एक लाल रंगाची खिडकी (विंडो) ओपन होईल. या विंडोमार्फत तुम्ही तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. पण यासाठी सर्वात आधी गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन http://www.youtube.com असे टाइप करा. आता तुमच्यासमोर सुरू झालेल्या ‘यू टय़ूब’च्या िवडोवर तुम्हाला अगदी सुरुवातीला िभगाचे एक चिन्ह आणि मोकळी चौकट दिसेल. जे ‘सर्च’चं चिन्ह असतं. या चौकटीत तुम्हाला हव्या असलेल्या व्हिडीओचे नाव टाइप करा. आता आपल्यासमोर टाइप केलेल्या विषयासंदर्भातील सगळे व्हिडीओ सुरूहोतील. आता नेमक्या अपेक्षित असलेल्या व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर तो व्हिडीओ सुरू होईल.
हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी अ‍ॅड्रेसबारमध्ये दिलेला पत्ता पूर्ण सिलेक्ट करून कॉपी करा. आता ‘यू टय़ूब डाऊनलोडर’मध्ये असलेल्या डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. आपल्यासमोर पेस्ट ‘यूआरएल’ असे लिहिलेली एक चौकट सुरू होईल त्या चौकडीत हा पत्ता पेस्ट करा. आता व्हिडीओ तुम्ही ‘सेव्ह टू’ या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी डाऊनलोड करून ठेवू शकता. समजा, तुम्हाला एखादा व्हिडीओ बघण्याऐवजी फक्त ऐकायचा असेल तर कनव्हर्ट हा पर्याय निवडून तुम्हाला हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये तुम्ही व्हिडीओ कनव्हर्ट करू शकता. आणि गंमत म्हणजे ज्या आजी-आजोबांकडे स्मार्ट फोन आहेत, तेसुद्धा हा वायटीडीमार्फत आपल्या फोनमध्ये व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. आजी-आजोबा, तुम्ही तुमच्या काळातील दुर्मीळ गाणी, सिनेमे पुन्हा एकदा ‘यू टय़ूब डाऊनलोडर’च्या माध्यमातून तुम्ही हवे तेव्हा पाहू शकता. शिवाय तुमच्या आवडत्या मालिकांचे बघायचे राहिलेले भागही.. फक्त ते नाव ‘सर्च’ मध्ये टाईप करायला विसरू नका    
 संकलन- गीतांजली राणे    ane.geet@gmail.com
आनंदाची निवृत्ती –  तांबे बाग घडत गेली..
पां.सा.तांबे    
‘युनियन बँक ऑफ इंडिया’मध्ये ३२ वर्षांच्या नोकरीनंतर १ ऑगस्ट २००१ रोजी सेवानिवृत्त झालो. पहिल्याच वर्षी निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून घराचे आवश्यक ते नूतनीकरण करून घेतले. घरातील साऱ्यांची मने प्रसन्न झाली. आता हाताशी भरपूर वेळ होता. पुण्यात सहकारनगरमध्ये राहत असल्याने रोज सकाळी शेजारच्या तळजाई टेकडीवर फिरायला जाऊ लागलो. यातून खूप ओळखी झाल्या. मस्त ग्रुप जमला! एक दिवस घरी आपोआपच आलेले औदुंबराचे रोप काढून नेऊन वर डोंगरावर छोटय़ा नातीच्या हातांनी लावले. त्यातूनच प्रेरणा मिळाली आणि परिसर हिरवागार करण्याचं हे बहुमूल्य काम माझ्या हातून झाले.
१ जुलै २००२ पासून सकाळी ७ ते ९ रोज २ तास श्रमदान करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी बांध घालून, वाफे करण्याचे काम सुरू केले. फिरायला येणाऱ्या लोकांपैकी काहींचा सहभाग लाभला. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार, आता टेकडीवरील सुमारे ६ एकर क्षेत्र हिरवेगार झाले असून पाचशेहून अधिक चिंच, वड, पिंपळ, बांबू, आंबा, करंज इ. देशी झाडे तेथे डौलाने नांदत आहेत. झाडांची नियमित देखरेख करून निगा ठेवतो. उन्हाळय़ांत पाणी घालण्यासाठी अनेक जण मदत करतात. अनेक वर्तमानपत्रांनी वेळोवेळी दखल घेतली आहे.
या कामाची दखल घेऊन काही संस्थांनी सत्कार करून गौरव केला. २००३ मध्ये योगी यादव यांच्या हस्ते, २००५ मध्ये मिसाळ प्रतिष्ठानतर्फे माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे हस्ते, ‘वृक्षमित्र’ पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरव केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील कलावंत उपस्थित होते. २०१३ मध्ये बुलढाणा जिल्हा क्रेडिट सोसायटीतर्फे ११ हजार रुपयांचा रोख पुरस्कारही मिळाला.
फिरायला येणाऱ्या दोन निसर्गप्रेमींनी, वन विभागाच्या पूर्वपरवानगीने माझ्या एका निसर्ग कवितेचे संगमरवरी काव्यशिल्प २००४ साली उभारले. अनेक लोक उभे राहून मनापासून कविता वाचतात, फोटो काढतात ते पाहून मन आनंदाने भरून येते.
आता लोक त्या क्षेत्राला ‘तांबे बाग’ म्हणून संबोधतात. पुरस्काराची थाप मिळालीच, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी आपण खारीचा का होईना वाटा उचलला याचे समाधान वाटते.  

‘रुकना मना है’
लीला तांबे
शिक्षिकेच्या नोकरीतून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हाच मी मनाशी ठरविलं होतं. मुलांसाठी लेखन करायचं. सुरुवात केली बडबड गीतांनी. नंतर छोटय़ांसाठी कविता, गोष्टी लिहायला लागले. माझ्या कविता, गोष्टी मान्यवर वर्तमानपत्रांतून छापून यायला लागल्या. खास मुलांसाठी असलेल्या मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्या. त्यामुळे मला खूप आनंद झाला.
आकाशवाणीवरील ‘गंमत जंमत’, ‘बालदरबार’ कार्यक्रमातून गोष्टी- कवितांचं प्रसारण होऊ लागलं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं नवोदित लेखकांसाठी असलेलं अनुदान माझ्या पुस्तकांना मिळाल्यामुळे ‘गोष्टी चिंटू’च्या आणि ‘संस्कार गोष्टी’ ही माझी पुस्तकं प्रकाशित झाली.
पुढे मी लघुकथा, ललित लेख लिहू लागले. अनेक स्पर्धामधून माझ्या लघुकथा व लेखांना बक्षिसं मिळत गेली. त्यामुळे लेखनाबद्दलचा माझा उत्साह द्विगुणित झाला. मुंबई आकाशवाणीवर ‘अस्मिता’ वाहिनीच्या विविध कार्यक्रमांतून कथा आणि लेखांचं वाचन होऊ लागलं.
शिक्षणाला वयाची अट नसते. मला लहानपणापासून शिवणकाम, भरतकाम, पेंटिंगची आवड आहे. वेळेअभावी मागे पडलेले माझे हे छंद मी नव्याने जोपासले. विस्मृतीत गेलेल्या गोष्टींची उजळणी केली.
नीब पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग करायला शिकले. कर्नाटकी कशिदा, कच्छी टाका शिकले. पॅच वर्क शिकले. कापडाचे विविध प्रकारचे तुकडे कापून सुरेख, सुंदर दुपटी शिवली. अंथरायच्या-पांघरायच्या मोठय़ा गोधडय़ा शिवल्या.
झबली, फ्रॉक, पंजाबी ड्रेसेसवर भरतकाम केलं. उशांचे अभ्रे, चादरीवर पेंटिंग केलं. नीब पेंटिंग करून फ्रेम्स बनविल्या. या सगळ्या वस्तू माझी आठवण म्हणून आप्तेष्टांना, प्रियजनांना वाटल्या.
यातून नवनिर्मितीच्या आनंदाबरोबर दुसऱ्यांना देण्याचा जो आनंद असतो तो मला मिळाला.
मी निमंत्रण पत्रिका, भेटकार्डे, सुंदर सुंदर चित्रांचे अल्बम बनवून संग्रही ठेवले.
वेळ कसा काढायचा हा प्रश्न मला कधीच पडला नाही. मला वेळ पुरत नाही. अजून खूप काही करायचं आहे. त्यामुळे ‘रुकना मना है।’

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
fraud of 21 lakhs by promising huge investment returns
नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?