परदेशातील बँकांत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांना तेथील मालमत्ता जाहीर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून, तसे केले नाही तर त्यांना तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अर्थसंकल्पात परदेशातील काळा पैसा आता दडवून ठेवता येणार नाही, तेथील मालमत्ता जाहीर केली नाही तर ७ वर्षे सश्रम कारावासाची तर प्राप्ती लपवून करचुकवेगिरी केल्यास १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होणार आहे, किंबहुना तशी तरतूद केली जाणार आहे.
यासंदर्भात एक विधेयक संसदेच्या आताच्या अधिवेशनात मांडले जाणार असून त्यात या तरतुदी केल्या जातील, असे सांगून ते म्हणाले की, काळा पैसा धारकांसाठी माफी योजना जाहीर करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, कुठलीही माफी दिली जाणार नाही, ज्यांनी मालमत्ता व खाती लपवली आहेत त्यांनी ती जाहीर करावीत.त्यासाठी ठराविक वेळही दिला आहे. जर तसे केले नाही तर सात वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होईल. परदेशातील पैसा दडवून करचुकवेगिरी करणाऱ्यांना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा केली जाईल. त्यांना खाते सुरू केल्यापासून सगळी माहिती द्यावी लागेल.