नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनता सध्या बॅंकेच्या ‘रांगे’त आलेली असताना, त्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुढील चार ते पाच महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे ‘द बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ने म्हटले आहे. देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा तयार करण्याचे काम केले तरीही बॅंकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे, असे या फेडरेशनने म्हटले आहे. यामुळे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधील आणि एटीएममधील रांगा तूर्ततरी कमी होण्याची शक्यता नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जुन्या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी लोकांनी बॅंकांसमोर रांगा लावायला सुरुवात केली.
काळ्या पैशांबाबत सेनेने ठोस धोरण ठेवावे!
सरकारने ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट बाजारात आणली आहे. पण त्याचा आवश्यक तेवढा पुरवठा बॅंकांकडे होत नाही. त्यामुळे रोकड पैशाने व्यवहार करण्यात लोकांची अडचण होते आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांवर २४x७ नव्या नोटांच्या छपाईचे काम सुरू असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. पण त्यानंतरही बॅंकांकडे आवश्यक चलन उपलब्ध होत नसल्याची तक्रार बॅंक अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येते आहे.
पुढच्या आठवड्यात नवा महिना सुरू होतो आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बॅंकापुढील अडचणीत आणखीनच वाढ होईल, असेही फेडरेशनने म्हटले आहे. वेतन झाल्यामुळे अनेक खातेदार मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी बॅंकांपुढे गर्दी करणार आहेत. पण त्याचवेळी बॅंकांना आवश्यक चलन न मिळाल्यास गोंधळात जास्तच भर पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विरोधकांना तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचे दु:ख- पंतप्रधान मोदी
द बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस पी. के. विश्वास म्हणाले, बॅंकांमधील चलन तुटवडा नजीकच्या काळातही कायम राहणार आहे. सर्व चलन निर्मिती केंद्रांवर पूर्ण क्षमतेने नोटा छापण्याचे काम केले तरी आवश्यक चलन तयार होण्यास आणि ते वितरणासाठी बॅंकांमध्ये येण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्या नंतरच परिस्थिती सुरळीत होऊ शकेल.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही खातेदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांच्या शाखांमध्ये तोडफोड केल्याचा दावाही विश्वास यांनी केला. बॅंकांकडे पुरेशी रोकड नसल्यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या वर्षी मार्च महिन्यात १५,७०७ दशलक्ष ५०० रुपयांच्या आणि ६३२६ दशलक्ष १००० रुपयांच्या नोटा बॅंकिंग व्यवहारात होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.