अमेठी न सांभाळू शकणारे देश कसे काय सांभाळू शकतील असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे सरकार गेल्याशिवाय देशाचे भले होणार नाही, असे वक्तव्य भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीत मनमोहन सिंह यांची सत्ता नसून आई – मुलाची सत्ता आहे असा टोलाही त्यांनी लगावला
छत्तीसगडमधील सरगूजा येथे आज (रविवार) मोदींची सभा झाली. यावेळी ते काँग्रेसवर जोरदार हल्ला करत म्हणाले, ”शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमेठीत माझ्या मुलाला सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन मतदारांना केले होते. त्यावर, जी व्यक्ती अमेठी सांभाळू शकत नाही ती व्यक्ती देश कसा सांभाळू शकेल. काँग्रेसचे सरकार गेल्याशिवाय देशाचे भले होणार नाही. दिल्लीत डॉ. मनमोहनसिंह यांची सत्ता नसून आई व मुलाची सत्ता आहे, असा टोला मोदींना लगावला.
देशात महिलांवर अत्याचाराच्या सर्वाधिक घटना काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये घडतात असे आरोपही त्यांनी केला. बारुंच्या वादग्रस्त पुस्तकावरुनही मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. देशाच्या अधोगतीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दोषी ठरवले जात होते. पण एका पुस्तकामुळे मनमोहन दोषी नसून आई – मुलाची जोडी यासाठी जबाबदार आहे हे उघड झाले असे त्यांनी सांगितले.