आपल्या कर्मचा-यांना एअरटेल, वोडाफोन यासारख्या कंपन्यांचे नेटवर्क न वापरण्याच्या सूचना रिलायन्सकडून देण्यात आल्या आहेत. रिलायन्सने इतर कंपन्यांच्या सेवा बंद करण्याचे आदेश आपल्या कर्मचा-यांना दिले आहेत तसेच सगळ्यांना आपला नंबर हा रिलायन्स जीओ ४ जी नेटवर्कमध्ये पोर्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रिलायन्सने डिसेंबरमध्ये जीओ ४ जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते.
रिलायन्स कंपनीत काम कराणा-या परंतु दुस-या कंपनीचे मोबाईल नेटवर्क वापरणा-या सगळ्याच कर्मचा-यांना आपले नंबर हे जीओमध्ये पोर्ट करण्याचे सांगण्यात आले आहे. रिलायन्सच्या एचआरकडून सगळ्या कर्मचा-यांना लिखीत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपले नेटवर्क दुस-या नेटवर्कमध्ये पोर्ट करण्यासाठी सात दिवसांचा अवधी लागेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले. एअरटेल आणि वोडाफोन यांनी याआधीच ४जी नेटवर्क लाँच केले आहेत. या दोन्ही रिलायन्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत त्यामुळे याविरुद्ध जणू रिलायन्सने आपली फौज तयार केली आहे आणि याचीच सुरूवात म्हणून रिलायन्सने आपल्या सगळ्या कर्मचा-यांना रिलायन्स ४जी सुविधा वापरण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या कंपनीत ४० हजारांहूनही अधिक कर्मचारी काम करतात. या सगळ्यांना लवकरात लवकर रिलायन्स  ४जी सेवा वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.