‘‘पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास स्वप्नपूर्ती होईल,’’ असे मत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले. मात्र, त्याच वेळी अपयश आल्यास थांबणार नाही. पुढील वाटचाल सुरूच ठेवणार असल्याचा सकारात्मक दृष्टिकोन सानियाने समोर ठेवला. सानियाने स्वित्र्झलडची जोडीदार मार्टिना हिंगिस हिच्यासह २०१५चे वर्ष गाजवले. गत आठवडय़ात या जोडीने डब्लूटीए फायनल टेनिस स्पध्रेत अजिंक्यपद मिळवत वर्षांतील नवव्या जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर मुंबईत दाखल झालेली सानिया मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत होती.
‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्व काही चांगले होईल, अशी आशा आहे. मी आणि लिएॅण्डर पेस मिश्र दुहेरीत पदक पटकावण्यात यशस्वी झालो, तर स्वप्न सत्यात उतरेल. मात्र, तसे न झाल्यास जग संपणार नाही,’’ असा पुनरुच्चार जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या सानियाने केला. भारताचे माजी डेव्हिस चषक स्पध्रेतील दिग्गज रमेश कृष्णन यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भारताला पदक पटकावण्याची संधी आहे, असा विश्वास व्यक्त केला होता.
सिंगापूरमध्ये डब्लूटीए फायनलचे जेतेपद पटकावल्यानंतर टेनिस दिग्गज मार्टिना नवरातिलोव्हाने सानियाचे कौतुक केले. त्यावर सानिया म्हणाली, ‘‘हा माझा सन्मान आहे. नवरातिलोव्हा मला म्हणाली की, टेनिसचा चेंडू मला फुटबॉलसारखा दिसतो.’’
खेळात आक्रमकता किती महत्त्वाची आहे, असे विचारल्यावर सानिया म्हणाली, ‘‘आपल्या लोकांचा स्वभाव कळेनासा झाला आहे. आक्रमक झालो तरी प्रश्न विचारले जातात आणि नाही झालो तरी. पण, माझ्या मते आक्रमकतेशिवाय खेळ होऊच शकत नाही. आक्रमकता असेल तरच यश मिळेल.’’

विश्वचषक पात्रता फेरीत चांगल्या कामगिरीसाठी कटिबद्ध – छेत्री
या कार्यक्रमाला सानियासह भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही उपस्थित होता. त्याने फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतील पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
छेत्री म्हणाला की, ‘‘विश्वचषक पात्रता फेरीत भारताची कामगिरी फार चांगली झालेली नाही. मात्र, १२ नोव्हेंबरला ग्वामविरुद्ध बंगळुरूला होणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसी क्लबकडून छेत्री खेळत आहे. १ नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात मुंबईला गतविजेत्या अॅटलेटिको डी कोलकाताकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. त्या विषयी छेत्री म्हणाला की, ‘‘आम्ही सलग तीन विजय मिळवले होते, परंतु सर्व दिवस सारखे असतील असे नाही. कोलकाताविरुद्ध आम्हाला सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले.’’