‘लय भारी’मध्ये सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून कसा बरे आला यामागची पटकथा खूप रंजक आहे…
हैदराबादच्या ‘रामोजी राव स्टुडिओत’ ‘लय भारी’बरोबरच ‘जय हो’ या चित्रपटाचेही चित्रीकरण सुरू होते. साहजिकच कुठे तरी सलमान आणि रितेश देशमुख यांची गाठभेट होणारच, ‘तुझ काय चाललय, कसं चाललयं’ अशी विचारपूस होणारच. तशी ती होताच सलमान म्हणाला, भाऊ तुझ्या या मराठी चित्रपटात मला काम दे ना? रितेशला सुरुवातीला ही सगळी मस्करी वाटली. पण दोन दिवस स्टुडिओच्या व्यायामशाळेत सल्लूने भेटताक्षणीच रितेशला ‘माझ्या भूमिकेचे काय बरे झाले’ असे विचारले, म्हणून मग रितेशनेच तिसऱ्या दिवशी व्यायामशाळेत जाणे टाळले.
तरी सल्लू पिच्छा सोडायला तयार नव्हता. अखेर, दिग्दर्शक निशिकांत कामत, यांच्याशी ‘चहा पिता पिता’ चर्चा करून एक प्रसंग निघालाच. (हुशार दिग्दर्शनाचे हेदेखिल एक लक्षणच) रितेशची माऊलीची व्यक्तिरेखा दारू पिते आणि एकदा माऊली आणि सल्लूची रस्त्यात गाठभेट होते असे दृश्य अखेर चित्रीत करायचे ठरले.
पण मग संवादाचे काय? सल्लूला त्याचे स्वातंत्र्य दिले आणि त्यात त्याच्या व्यक्तिगत अनुभवातील संवादाचा वापर करण्यात आला. सलमानची प्रेमप्रकरणे कायम बहुचर्चित झाल्याने त्याच्याकडे बोलण्यासारखे बरेच काही होते. तेच या प्रसंगात उतरल्याने प्रेक्षकानी हे सगळं एन्जॉय केले.
खुद्द रितेश देशमुखने ‘लय भारी’च्या यशाच्या पार्टीत हा किस्सा सांगितला…