बॉलिवूडमध्ये ज्युनियर आर्टिस्टपासून ते प्रसिद्ध कलाकारापर्यंत सर्वांच्याच खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. त्यातही काही सेलिब्रिटींचा भूतकाळ, संघर्षाचे दिवस आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास या सर्व गोष्टी इतक्या रंजक असतात की त्या जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. अशाच काही सेलिब्रिटींच्या संघर्षाच्या दिवसांतील रिलेशनशिपवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. चित्रपटसृष्टीत नावारुपास येण्यापूर्वी सेलिब्रिटी अशा काही व्यक्तींच्या संपर्कात होत्या ज्यांनी त्या सेलिब्रिटींच्या संघर्षाच्या काळातही त्यांना साथ दिली होती. पण, म्हणतात ना ‘आयुष्यात यश आपल्या वाट्याला आल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात’, असंच काहीसं या सेलिब्रिटींच्या बाबतीतही घडलं. संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्यांकडे या सेलिब्रिटींनी पाठ फिरवली आणि त्यांच्यासोबतचे संपर्कच तोडले.

अशाच काही कलाकारांच्या यादीतील पहिलं नाव आहे सोनाक्षी सिन्हा. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी ‘अॅडलॅब्स’च्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मुलासोबत म्हणजेच आदित्य श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. पण, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि आदित्यने टेलिव्हिजन अभिनेत्री मेघा गुप्ताशी लग्न केलं.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली आलिया भट्टसुद्धा काही वर्षांपूर्वी बालपणीचा मित्र अली दादरकर याला डेट करत होती. पण, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मात्र अलीसोबत तिने सर्व संपर्क तोडले.

सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत ऐश्वर्या रायचं नाव जोडलं गेलं होतं. पण, त्याआधी मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अॅशचं नाव राजीव मूलचंदानीसोबत जोडलं गेलं. किंबहुना त्यांचं अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. पण, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर प्रसिद्धी आणि यश ऐश्वर्याच्या वाट्याला येताच तिने हळहळू राजीवपासून चार हात दूर राहण्याला प्राधान्य दिलं.

बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रणबीर कपूरही चित्रपटसृष्टीत नावारुपास येण्यापूर्वी अवंतिका मलिक हिच्यासोबत जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. पण, त्यानंतर त्याचं नाव दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांच्याशी जोडलं गेलं. किंबहुना असंही म्हटलं जातं की, दीपिकासाठीच रणबीरने अवंतिकाला आपल्यापासून दूर केलं.

सध्या सर्वत्र ‘विरुष्का’च्याच रिलेशनशिपच्या चर्चा असल्या तरीही सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मात्र अनुष्काच्या जीवनात विराटऐवजी कोणा दुसऱ्याच व्यक्तीचं महत्त्वाचं स्थान होतं. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर संघर्षाच्या दिवसांमध्ये अनुष्का जोहेब युसूफसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनीही चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय एकत्रच घेतला होता. बी- टाऊनमध्ये अनुष्काला ब्रेक मिळाला आणि ती प्रसिद्धही झाली. पण, जोहेब मात्र यामध्ये अपयशी ठरला आणि त्यांच्या नात्यात कायमचा दुरावा आला.

बॉलिवूडची ‘मस्तानी’सुद्धा एकेकाळी निहार पंड्याला डेट करत होती. पण, बॉलिवूडच्या या झगमगाटाच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर मात्र तिला निहारचा विसर पडला. तिने हळूहळू त्याला टाळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतरच्याच काही दिवसांमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.