‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह-पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबर २०१५ मध्ये मुंबईत होणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनात प्रभुणे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्काराचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. सन्मानित व्यक्तीला दिली जाणारी यंदाची रक्कम एक लाखाऐवजी तीन लाख रुपये असेल. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रभुणे यांची निवड केली. या समितीत निशिकांत ऊर्फ नाना जोशी, दीपक घैसास, सुधीर जोगळेकर, भानू काळे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. सुधा कोठारी यांचा समावेश होता. भटक्या-विमुक्त जातीचे विशेषत: पारधी जमातीच्या पुनर्वसनासाठी घेतलेले परिश्रम, उपेक्षितांच्या समस्यांबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच नैसíगक शेती, पाणलोट क्षेत्र विकास, बालशिक्षण संदर्भात सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून केलेले प्रयोग आणि त्यांच्या अव्याहत कार्याची दखल घेऊन निवड समितीने या पुरस्कारासाठी प्रभुणे यांची एकमताने निवड केली आहे. यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठीचा पुरस्कार इंदिराबाई ऊर्फ मावशी हळबे, डॉ. इंदुमती पारिख, पांडुरंगशास्त्री आठवले, नानाजी देशमुख, साधनाताई आमटे, शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला होता.