पोलीस बदली घोटाळा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळय़ामधील विशाल आंबळे आणि कमलेश कानडे या दोन दलालांचा जामीन अर्ज शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:हून संपर्क साधून बदलीसाठी विनंती केली होती, त्यांच्याशी पैशांचा व्यवहार झालेला नाही. त्यामुळे फसवणुकीचा प्रश्नच येत नाही, असा दावा आरोपींनी जामीन अर्जात केला होता. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे अधिकारी टोळीच्या का, कसे संपर्कात आले, या टोळीशी काही आर्थिक व्यवहार केले का, याबाबत चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. या चौघांच्या चौकशीवरून कमलेश कानडे, चंद्रकांत ऊर्फ रितेश राखुंडे या दलालांना अटक करण्यात आली होती. अॅड. महेश मुळये यांनी आरोपी कानडेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना आरोप फेटाळून लावले. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे यापैकी एकही गुन्हा कानडेने केलेला नाही. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. सरकारी वकील अॅड. सूर्यवंशी यांनी मात्र कानडे व ओंबळे हे दोघे या घोटाळय़ाचे सक्रिय सदस्य असल्याचे पुरावे गुन्हे शाखेकडे आहेत, असा दावा आपल्या युक्तिवादात केला. अखेर न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने ३१ मे रोजी हॉटेल सहारास्टार येथे धाड घालून या घोटाळा पर्दाफाश केला होता. महानंद डेअरीचे महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे, किरण माळी, विशाल आंबळे आणि रवींद्रसिंग महोब्बतसिंग ऊर्फ शर्मा अशा चौघांना अटक केली होती. या टोळीने चव्हाण यांना नवी मुंबई परिसरात बदलीचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांना हॉटेल सहारास्टार येथे बोलावले होते. पुढील चौकशीत राज्यातील अनेक पोलीस अधिकारी या टोळीच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली.