दीडशे नागरिकांच्या डोळ्याला इजा दिवाळी हा आनंदाचा सण आहे, परंतु काही व्यक्ती आनंदाच्या भरात मनात येईल तेथे फटाके फोडताना दिसतात. या प्रकाराने त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात येतो. नागपूर जिल्ह्य़ाच्या अनेक भागात हे चित्र असून प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्याच्या बारूदने १५० हून जास्त व्यक्तींच्या डोळ्याला इजा होऊन पैकी उपचारादरम्यान १५ पेक्षा जास्त व्यक्ती आपले डोळेही गमावताना दिसत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भारतात फटाक्यामुळे येणाऱ्या अंधत्वाची संख्या ही वर्षांला ५ हजारांच्या जवळपास आहे, हे विशेष. दिवाळीत फोडलेल्या फटाक्यामध्ये चारकोल, गंधक, नायटो क्लोरेट, परफलोरेस्टसह इतरही घातक घटक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुरातून फुफ्फुसावर परिणाम होतो. याशिवाय त्वचाविकारातही वाढ होते. फटाक्याच्या सजीव आणि निर्जीवांवर दुष्परिणाम होतो, तर फटाक्यांचा तेजोमय उजेड आणि फटाके उडवलेल्या ठिकाणचे तापमान ४०० ते ५००० पर्यंत वाढते, धूर निघतो, आवाजाचे अर्थात ध्वनिप्रदूषण, जल प्रदूषण, वायूप्रदूषणात मोठय़ा प्रमाणात भर पडते. फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची भीती असते. गंभीर दुखापतीमुळे डोळा काढावा लागू शकतो. दिवाळीच्या सणांत नकळत बाधित व्यक्तींपैकी ६० व्यक्ती २० वर्षांखालील असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. त्यातील ८० टक्के पुरुष असतात. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये प्रामुख्याने अनार, सुतळी बॉम्ब आणि चक्री आणि रॉकेटचा समावेश असतो. तेव्हा फटाके उडवताना प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. इजा झाल्यास डोळे चोळू नका फटाके उडवताना प्रत्येकाने काळजी घेतल्यास अपघात टाळता येतो, परंतु त्यानंतरही फटाके उडवताना डोळ्याला इजा झाल्यास जखम चोळू नये, त्यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते. डोळ्यातील फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. याप्रसंगी पाण्याने डोळे धुणेही धोकादायक असून त्याने जंतूसंसर्गाचा धोका आहे. तेव्हा प्रत्येकाने तातडीने शासकीय वा खासगी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मत मेडिकलच्या नेत्रविभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी व्यक्त केले. - डॉ. अशोक मदान