घातक संसर्गजन्य रोग पसरवणारे जीवाणू कोणत्याही प्रतिजैविक औषधाला दाद देईनासे झाले तर..? ही कल्पनाच हादरवून सोडणारी आहे, कारण तसे झाले तर हे जीवाणू धुमाकूळ घालतील आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या साथी आटोक्यात आणणेही मुश्किल होईल. ही कल्पना प्रत्यक्षात आणू शकणारे जीवाणू अर्थात ‘सुपरबॅक्टेरिया’ भारतात मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. औषधनिर्मितीमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अशा घातक जीवाणूंची निर्मिती होत असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थेच्या (एनसीसीएस) संशोधकांनी दाखवून दिले आहे.
हैदराबादजवळील पतनचेरू हे औषधनिर्मितीचे देशातील सर्वात मोठे केंद्र आहे. तेथील ९० औषध उत्पादक प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर ज्या ठिकाणी प्रक्रिया होते, तेथील नमुने तपासल्यानंतर ‘एनसीसीएस’ च्या संशोधकांना अनेक धक्कादायक बाबी आढळल्या. या अभ्यासकांनी एकूण ९३ प्रकारचे जीवाणू तपासले. त्यांच्यावर सध्या वापरात असलेल्या ३९ प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) नेमका काय प्रभाव पडतो, याचा अभ्यास केला असता निम्म्याहून अधिक जीवाणूंनी ३९ पैकी २९ औषधांना न जुमानण्याचे गुणधर्म आत्मसात केले आहेत. त्यात पेनेसिलिन, अॅम्पेसिलिन, अॅजिथ्रोमायसिन, एरिथ्रोमायसिन, सिप्रोक्लोक्सॅसिन अशा अनेक प्रतिजैविकांचा समावेश आहे. ‘एनसीसीएस’ चे नचिकेत मराठे, विडूथलई, संदीप वाळुजकर, शक्ती सिंग, डॉ. योगेश शौचे तसेच, स्वीडनमधील प्रसिद्ध अभ्यासक एडवर्ड मूर व इवॉकिम लार्सन यांनी मिळून हा अभ्यास केला आहे. याबाबतचा प्रबंध ख्यातनाम आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘प्लोस वन’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
याचा धोका काय?
प्रक्रिया प्रकल्पातून हे पाणी नदीत सोडले जाते. असे जीवाणू नदीच्या पाण्याद्वारे माणसाच्या संपर्कात येऊ शकतात. त्यांच्यामुळे संसर्ग पसरला तर त्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतिजैविकांची मात्रा लागू पडणार नाही. हैदराबादप्रमाणेच गोवा व देशाच्या इतर भागातही औषधनिर्मिती प्रकल्प आहेत. या सर्वच ठिकाणी असे घातक जीवाणू निर्माण होऊ शकतात.
कसे बनतात सुपर बॅक्टेरिया?
औषधनिर्मिती प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात प्रतिजैविकांचे प्रमाण प्रचंड असते. इथे वेगवेगळे जीवाणू एकत्र येतात. ते जीवाणू जगण्यासाठी स्वत:मध्ये बदल करून घेतात. विशेष म्हणजे इथे जीवाणूंनी एकमेकांचे गुणधर्मही आत्मसात केले आहेत. त्यामुळे ते प्रतिजैविकांना दाद देत नाहीत.
*या प्रकल्पातील ‘ऑक्रोबॅक्ट्रम इंटरमिजियम’ हा जीवाणू ३९ पैकी ३८ प्रतिजैविकांना दादच देत नाही. या जीवाणूमुळे हगवण (डायरिया), अल्सर यांचा संसर्ग होऊ शकतो.
*दुसरा जीवाणू ‘प्रोव्हिडेन्शिया’ याने ३५ प्रतिजैविकांना जुमानले नाही. त्याच्यामुळे हगवण तसेच मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो.
*या दोन्ही जीवाणूंमध्ये मूलत: केवळ १८ किंवा त्यापेक्षा कमी प्रतिजैविकांवर मात करण्याचे गुणधर्म आहेत. इतर गुणधर्म त्यांनी प्रकल्पात आत्मसात केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
देशात घातक ‘सुपर बॅक्टेरिया’ निर्मितीची केंद्रे!
घातक संसर्गजन्य रोग पसरवणारे जीवाणू कोणत्याही प्रतिजैविक औषधाला दाद देईनासे झाले तर..? ही कल्पनाच हादरवून सोडणारी आहे, कारण तसे झाले
First published on: 12-11-2013 at 04:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harmful super bacteria production centers in india