मोठा गाजावाजा करून पिंपरी महापालिकेने रडतखडत चारपैकी एक बीआरटी 11brtमार्ग सुरू केला. मात्र, खऱ्या अर्थाने विनाअडथळा व विनाअपघात बीआरटी कार्यरत ठेवण्यासाठी अडथळ्यांची शर्यत असून अनेक माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले सुरक्षिततेचे प्रश्नही कायम आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास १२० किलोमीटर अंतराचे दहा बीआरटी मार्ग प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात ४५ किलोमीटरचे चार मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे, नाशिकफाटा ते वाकड, काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता मार्गांचा समावेश आहे. याशिवाय, देहू-आळंदी, टेल्को रोड, बोपखेल-आळंदी, भक्ती-शक्ती ते किवळे, िहजवडी ते केएसबी आणि भोसरी ते मोशी हे मार्ग नंतरच्या टप्प्यात होणार आहेत. बीआरटी मार्गावर आतापर्यंत ५०० कोटी रुपये खर्च झाला आहे. यापुढील काळात केंद्राचा निधी मिळो अथवा नाही, या कामासाठी पालिकेची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे होणार आहेत. इतका खर्च करूनही  सुरक्षिततेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.
पाच सप्टेंबरला पहिल्या मार्गाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले आणि तीनच दिवसात पुनावळ्यात अपघात होऊन एक तरुण मृत्युमुखी पडला. ही सुरुवात आहे, यातील सुरक्षिततेच्या मुद्दय़ांकडे गांभीर्याने न पाहिल्यास अपघातांची मालिका सुरूच राहील, अशी भीती अनेक स्तरातून व्यक्त होऊ लागली. माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग कामतेकर यांनी या संदर्भात अनेक आक्षेप घेतले असून अॅड. हिम्मतराव जाधव यांनी याचिकेद्वारे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याची सोमवारी सुनावणी आहे. या सर्व बाबींची दखल घेण्यात आली असून आयआयटी पवईचे पथक बोलावून त्यांच्या सल्ल्यानंतर काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. वेगवगळ्या मार्गाने बीआरटीचा प्रचार, प्रसार तसेच जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मुळातच बीआरटी सुरू करताना अनेक अडचणी आल्या. २००८ मध्ये बीआरटी सुरू करण्याचा निर्णय झाला होता, त्याला २०१४ उजाडले. प्रत्यक्षात बीआरटी धावण्यासाठी पाच सप्टेंबर २०१५ चा मुहूर्त पाहावा लागला. आता सुरक्षिततेचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असून त्याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.