उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पुन्हा एकदा राम मंदिरचा राग आळवला आहे. रामललाचे मंदिर दोन महिन्यात बनणार नाही. आता निवडणुकीनंतरच राम मंदिर उभाणार आहे. राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे, असे भाजपचे उत्तर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी सांगितले. त्याचबरोबर निवडणुकीनंतर भाजपची बहुमताने सत्ता येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

https://twitter.com/ANINewsUP/status/824089162408005632

केशव मौर्य यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी समाचार घेतल्यानंतर मात्र बुधवारी लगेचच त्यांचा सूर बदलला. मी अशा पद्धतीचे कुठलेच वक्तव्य केलेले नाही. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर निशाणा साधला. भाजपला निवडणुकीपूर्वीच रामाची कशी आठवण येते, असा सवाल त्यांनी विचारला तर दुसरीकडे मायावती यांच्या बसपनेही भाजपवर हल्लाबोल केला.
भाजप उत्तर प्रदेश आणि केंद्रातही यापूर्वी सत्तेवर होती. मग त्यावेळेसच मंदिर का बांधले नाही. निवडणुका येताच भाजपला मंदिराचा मुद्दा आठवतो, अशी टीका संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी केली.
केशव मौर्य यांच्या समर्थनात खासदार सुब्रमण्यम स्वामी रणांगणात उतरून हे प्रकरण आणखी चर्चेत आणले आहे. राम मंदिर उभारण्याचे वचन भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दा आहे, असे म्हणत त्यांनी केशव मौर्य यांचे समर्थन केले.

https://twitter.com/ANINewsUP/status/824107627009318912