RCB victory parade : आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. आज त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास १५ जण जखमी झाले आहेत. बंगळुरुतल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींची संख्या १५ झाली आहे आणि ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हटलं आहे प्रत्यक्षदर्शींनी?
अनेक लोक, मुली मोठ्या प्रमाणावर विराट कोहली आणि विजयी संघाला पाहण्यासाठी थांबल्या होत्या. विराट आणि विजयी टीम येताच अनेक मुली त्या दिशेने धावल्या आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं गेट ढकलून आत गेल्या. त्यावेळी मी पाहिलं तीन मुली खाली पडल्या. त्यांना कुणीही सोडवलं नाही. पोलीसही काहीच करु शकले नाहीत. त्या मुली घाबरल्या होत्या. तर इतर मुलींना विराट कोहलीला पाहायचं होतं. पोलीस आणि सुरक्षा दलं काही करु शकले नाहीत कारण इतकी गर्दी होईल अशी कल्पना कुणालाच नव्हती. ६०० ते ७०० लोक त्या ठिकाणी आले होते. आत जाण्यासाठी तिकिटं मिळत होती. पण गेट बंद झालं होतं. अनेक मुली विराटला पाहण्यासाठी उत्सुक होत्या आणि स्टेडियमच्या दिशेने धावल्या होत्या. कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती असं महेश या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
या घटनेबाबत एका मुलीने काय सांगितलं?
आम्ही मैदानावर विराट कोहली आणि विजयी टीमला पाहण्यासाठी आलो आहोत. मात्र मैदानातील सगळ्या जागा भरल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये. तसंच मागेही जाऊ दिलं जात नाहीये कारण बरीच गर्दी या ठिकाणी झाली आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत असं एका मुलीने ANI ला सांगितलं.
१८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. आरसीबीच्या विजयानंतर संपूर्ण जगभरातील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसला. यादरम्यान बंगळुरूमध्ये संघ या विजयाचा चाहत्यांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला आहे. संघ प्रथम विधान सौधा येथे पोहोचला, जिथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला.