पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. चारही धरणांमध्ये मिळून एकूण ५.४५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असून, गतवर्षीच्या याच दिवसांच्या तुलनेत हा पाणीसाठा १.६५ टीएमसीने जास्त असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४७ मिलीमीटर, पानशेत आणि वरसगाव धरण परिसरात प्रत्येकी ९३ मिलीमीटर तर टेमघर धरण क्षेत्रात ८० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली. चारही धरणात मिळून आजमितीस २०८.५५ दशलक्ष घनमीटर साठा असून, त्यामध्ये १५४.३७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गेल्या वर्षी चारही धरणात याच दिवशी ३.८० टीएमसी एवढा पाणीसाठा होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एक जूनपासून टेमघरमध्ये २०८ मिलीमीटर, वरसगाव धरण परिसरात १८६ तर पानशेत धरणाच्या क्षेत्रात १८३ मिलीमीटर तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १८२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.