किलोला ८० रुपयांपर्यंत भाव मिळवून देणाऱ्या ऑगस्टने महागाईचा दर उंचावर ठेवला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळेही गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांक ६.१ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यात तो ५.७ टक्के होता. ऑगस्ट २०१२ मध्ये दर ८.०१ टक्के होता.
वार्षिक तुलनेत कांद्याचे दर तब्बल २४५ टक्क्यांनी वधारले आहेत, तर ऑगस्ट २०१३ मध्ये भाज्यांच्या किमती ७७.८१ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. अन्नधान्याचा महागाई दरही ऑगस्ट २०१२ च्या तुलनेत वधारून थेट १८.१८ टक्के झाला आहे. बटाटे (-१५%), डाळी (-१४%) यांचे दर मात्र कमी झाले आहेत. त्याचबरोबर साखर, खाद्यतेलाचे भावही अनुक्रमे ४.२ व ३.८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. बिगर अन्नधान्य आणि निर्मिती वस्तूंचे दर कमी झाले आहेत.
ऑगस्टमधील महागाईच्या रुपात सलग तिसऱ्या महिन्यात चढा क्रम राहिला आहे. तर गेल्या सहा महिन्यातील उच्चांकही राखला गेला आहे. यंदाच्या अन्नधान्याच्या महागाईचा दर हा गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी टप्प्यावर आहे. डिसेंबर २०१० नंतर महागाई कांद्यांच्या वधारणाऱ्या दरांमुळे वरच्या टप्प्यावर आहे. वर्षभरात कांद्याच्या किंमती तब्बल २४४ टक्क्यांनी उंचावल्या आहेत.
वाढता वाढे..      जून : ५.१६%     जुलै : ५.७९%     ऑगस्ट : ६.१०%
महागाईचा यंदाचा वाढता दर रुपयातील कमकुवतपणामुळे आहे. चांगल्या मान्सूनमुळे  येत्या काही महिन्यांत महागाईचा दर घसरताना दिसून येईल.  मार्च २०१४ अखेर हा दर ५.५ टक्के असेल. परकीय चलन आणि महागाई या बाबी रिझव्‍‌र्ह बँकेला पतधोरणात निर्णय घेण्यास दबाव निर्माण करू शकतात.
– सी. रंगराजन,
पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार.