अर्थव्यवस्थेतील सुधार दृष्टिक्षेपात असून औद्योगिक उत्पादन वाढ, पायाभूत सेवा क्षेत्राचा विस्तार या जोरावर भारत चालू आर्थिक वर्षअखेर ५.८ टक्क्यांवर प्रगती करेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ सचिव अरविंद मायाराम यांनी व्यक्त केला.
‘असोचेम’ या उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात मायाराम यांनी २०१४-२०१५ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर ५.८ टक्के असेल, असे नमूद केले. रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारीच जारी केलेल्या अहवालात मात्र हा दर ५.५ टक्के अभिप्रेत केला आहे. तर आर्थिक सर्वेक्षणातही विकासाचा दर ५.४ ते ५.९ टक्क्यांदरम्यान असेल, असे यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत विकासाचा दर ४.७ टक्के असा दशकातील किमान राहिला आहे.
मायाराम म्हणाले की, मध्यान्ही अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या असून त्यांचे दृश्यस्वरूप उमटत आहे. औद्योगिक उत्पादन वाढत आहे. वाहनांची विक्रीही वधारत आहे. पायाभूत सेवा क्षेत्रातील हालचालही तीव्रतेने वाढत आहे.
व्याजदर
रिझव्‍‌र्ह दीर्घ कालावधीसाठी चढे व्याजदर ठेवू शकणार नाही. महागाईचा दर कमी होताना दिसत आहे. महागाई आणखी कमी होईल. आणि मध्यवर्ती बँकेला व्याजदर कपात करणे निश्चितच भाग पडेल.
इंधन दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांचे दर उतरत असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही इंधनाचे दर कमी होतील. डिझेलच्या किमती बाजारसंलग्न ठेवून त्यावरील अनुदान लवकरच  पूर्णत: रद्द होईल.
सोन्याच्या किमती
सोन्याच्या आयातीवरील र्निबध अजून काही काळ कायम असतील. निर्यातीतून जेव्हा आपण अधिक उत्पन्न घेऊ तेव्हाच आपण र्निबध शिथिल करण्याबाबत योग्य स्थितीत असू.

बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज ५.४ टक्क्यांचा
भारताच्या अंदाजित विकास दराच्या अपेक्षांमध्ये सहभागी होत जागतिक वित्तीय सेवा कंपनी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिन्चनेही आपला अंदाज उंचावला आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठीचा यापूर्वीचा आपला ४.६ टक्के अंदाज ५.४ टक्क्यांवर नेऊन ठेवला आहे. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या जोरावर भारताचा विकास दर पुढील आर्थिक वर्षांत, २०१५-१६ मध्ये ६.५ टक्के होईल, असे नमूद करण्यात आले आहे. एप्रिल ते जून २०१४ दरम्यान विकास दर ६ टक्के असेल, असेही बँकेने म्हटले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकही आशावादी
ल्ल देशातील निर्मिती व गुंतवणुकीने घेतलेला वेग पाहता चालू आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केली आहे. खनिकर्म, निर्मिती तसेच गुंतवणूक आणि खासगी क्षेत्रातील अर्थ संसाधनातील वाढती उपलब्धता यामुळे अर्थसुधाराचे चित्र उमटत असून २०१४-१५ दरम्यान विकासाचा दर ५.५ ते ६ टक्के असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
कमी मान्सूनची स्थिती आगामी कालावधीत राहणार असल्याने महागाईचा आगामी अंदाज कायम ठेवण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. जानेवारी २०१५ अखेर ग्राहकोपयोगी वस्तू किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ८ टक्के असेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.