देशाच्या ट्रॅक्टर बाजारपेठेत आजवर जे अशक्य मानले गेले ते शक्य करून दाखविण्यासाठी महिंद्र अॅण्ड महिंद्रने चंग बांधला असून, ५० हून अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर बाजारपेठेत स्पर्धेला चालना देऊन येत्या काळात या बाजारवर्गावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण कंपनीने आखले आहे. कंपनीने ‘अर्जुन नोव्हो’ या नाममुद्रेने ५२ आणि ५७ अश्वशक्ती क्षमतेचे ट्रॅक्टर्सचे अनावरण बुधवारी केले आणि ‘अर्जुन’ नाममुद्रेने यापूर्वी बाजारात आलेले व लोकप्रिय ठरलेले कमी अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचे उत्पादन बंद करण्याचाही निर्णय घेतला. महिंद्रची ही नवी प्रस्तुती म्हणजे या वर्गवारीतील सर्वात किफायती पर्यायही ठरली आहे.
भारतात ट्रॅक्टर्स बाजारपेठेत सध्या ५० टक्क्य़ांहून अधिक विक्री ही ३० ते ४० अश्वशक्ती वर्गवारीतील ट्रॅक्टर्सची असून, ४८ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टर्सचा बाजारहिस्सा अवघा १६ टक्केआहे. परंतु शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब ज्या वेगाने सुरू आहे, त्या प्रमाणात ५० हून अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर्सची मागणीही वाढेल आणि त्यांचा बाजारहिस्सा लवकरच १९-२० टक्क्य़ांच्या घरात गेलेला दिसेल, असा विश्वास महिंद्रच्या शेती उपकरणे विभागाचे मुख्याधिकारी राजेश जेजुरीकर यांनी व्यक्त केला.
‘अर्जुन नोव्हो’च्या अनावरणाने ५० हून अधिक अश्वशक्तीच्या बाजारपेठेत महिंद्रचा दबदबा वाढेल, त्याचप्रमाणे ट्रॅक्टर्सची बाजारपेठ विस्तारली जाऊन अधिक क्षमतेचे ट्रॅक्टर्सचे त्यात प्रमुख योगदान असेल, असे जेजुरीकर यांनी मत व्यक्त केले. महिंद्रची या वर्गवारीत जॉन डीअर आणि न्यू हॉलंड यासारख्या आंतरराष्ट्रीय निर्मात्यांशी प्रमुख स्पर्धा आहे.
नवीन अर्जुन नोव्हो ट्रॅक्टरची निर्मिती ही चेन्नईस्थित ‘महिंद्र रिसर्च व्हॅली’मधील १०० हून अधिक अभियंत्यांच्या तीन वर्षांच्या संशोधनात्मक परिश्रमाची फलश्रुती आहे. महिंद्रने हे नवीन ट्रॅक्टर व नवीन उत्पादन मंचाच्या विकसनावर २५० कोटी रुपये खर्च केले असून, येत्या दोन वर्षांत या बाजारवर्गात आणखी काही उत्पादने आणण्याचाही तिचा मानस आहे. त्यासाठी आणखी गुंतवणुकीची कंपनीने आखणी केली आहे, असे महिंद्र अॅण्ड महिंद्रचे शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांनी स्पष्ट केले. अर्जुन नोव्होची निर्मिती कंपनीच्या नागपूर येथील प्रकल्पातून केली जाणार आहे, तर या नव्या उत्पादन मंचावर आधारित नवीन अधिक क्षमतेची ट्रॅक्टर्स उत्पादने झहिराबाद (तेलंगण), मुंबई तसेच मोहालीमधून तयार केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
५२ आणि ५७ अश्वशक्तीची नवीन महिंद्र नोव्हो ट्रॅक्टर्स अनुक्रमे ७.१५ लाख रुपये आणि ७.३५ लाख रुपये किमतीत (एक्स-शोरूम पुणे) उपलब्ध झाली आहेत. उल्लेखनीय म्हणजे ४८ अश्वशक्तीच्या सध्या लोकप्रिय असलेल्या कंपनीच्या ‘अर्जुन ६०५ डीआय’ची जागा घेणारे हे नवीन ट्रॅक्टर अनेक अद्ययावत वैशिष्टय़े व क्षमतेसह येऊनही केवळ १५ हजार रुपयांनी महाग असल्याचे महिंद्र ट्रॅक्टर्सच्या विपणन विभागाचे प्रमुख रवींद्र शहाणे यांनी सांगितले. आधीच्या अर्जुन ट्रॅक्टर्सच्या विक्रीने २० हजाराचा आकडा गाठला होता आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून त्याने सर्वाधिक पसंती मिळविल्याचे त्यांनी सांगितले. नवीन ‘अर्जुन नोव्हो’ हे वातानुकूलित केबिन प्रकारात (किंमत ९.१५ लाख रु.) उपलब्ध झाले असून, ते भारतात तयार झालेले या प्रकारचे पहिले ट्रॅक्टर आहेत.
शेतीतील यांत्रिकीकरणाचा कल अनुकूल
ग्रामीण भागाचे वेगाने होत असलेले नागरीकरण, विस्थापन तसेच ‘मनरेगा’सारख्या सरकारी धोरणामुळे शेतीसाठी मजुरांचा भासत असलेला तुटवडा, त्या उलट केंद्रात स्थापित झालेल्या नव्या सरकारचा शेती विकास व जमीन सुधारणेवरील भर, कृषीक्षेत्रात बडय़ा कंपन्यांचा प्रवेश, कॉन्ट्रॅक्ट फार्मिग वगैरेमुळे जमीन मालकी व लागवडीचे क्षेत्रही विस्तारत आहे, असे ते म्हणाले.
जमिनीच्या छोटय़ा तुकडय़ाची मालकी आणि ट्रॅक्टर्ससारख्या आधुनिक साधनांचा शेतीसाठी वापर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट करताना जेजुरीकर म्हणाले की, अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण अवकाशातील नव्या बदलांचा कल हा आधुनिक शेतीपद्धतीकडे झुकणारा असून, परिणामी जमिनीचे सपाटीकरण, शाकारणी, नांगरणी, कापणी, भारवहन, वाहतूक अशी अनेकांगी कामे एकहाती करणाऱ्या ‘अर्जुन नोव्हो’सारख्या ट्रॅक्टर्सना मागणी वाढत जाईल. कमीत कमी जमिनीतून अधिकाधिक पीक उत्पादकता आणि फायदा आधुनिक शेतकऱ्याला हवा आहे आणि गेल्या २-३ वर्षांत देशात शेतकामामध्ये टिलर, रोटोव्हेटरसारख्या आधुनिक साधनांचा वापर हेच दर्शवितो, असे जेजुरीकर यांनी सांगितले.