महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा चालू आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार? निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मशाल या चिन्हावरच पुढील निवडणुका लढवाव्या लागतील असं चित्र निर्माण झालं आहे. ठाकरे गटानं आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, अद्याप ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली नसल्यामुळे अजूनही त्यावरून अंदाज वर्तवले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या टॅरो कार्ड्सवरून त्यांच्या भविष्याबाबत अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न टॅरो कार्ड रीडर जयंती अलूरकर यांनी केला आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना आलेल्या 'डेव्हिल कार्ड'चाही उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी दोन वर्षं त्रासदायक! सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक असल्याचं दिसत आहे. मात्र, पुढची दोन वर्षं, म्हणजेच २०२३ ते २०२५ हा काळ उद्धव ठाकरेंसाठी त्रासदायक आणि आर्थिक नुकसानीचा असल्याचं भाकित जयंती अलूरकर यांनी वर्तवलं आहे. 'याकाळात एका मागून एक संकटे त्यांच्या दिशेने येताना दिसत आहेत. हीच वेळ आहे त्यांनी स्वतःला सावरायची’, असं भाकित जयंती अलूरकर यांनी वर्तवलं आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रूंना बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते’, असाही अंदाज अलूरकर यांनी उद्धव ठाकरेंचे टॅरो कार्ड्स पाहून वर्तवला आहे. पुढची दोन वर्षं उद्धव ठाकरेंसाठी त्रासदायक, आर्थिक नुकसान…; टॅरो कार्डरीडर जयंती अलूरकरांनी वर्तवलं भाकित! उद्धव ठाकरेंचं डेव्हिल कार्ड आणि हितशत्रू! दरम्यान, जयंती अलूरकर यांनी टॅरो कार्डमधील उद्धव ठाकरेंना आलेल्या डेव्हिल कार्डचाही उल्लेख केला आहे. 'उद्धव ठाकरे यांना आलेले 'डेव्हिल' कार्ड हे दाखवत आहे की काही वाईट प्रवृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी. मी-मी म्हणणारे हितशत्रू संधी साधून निसटून जातील आणि त्यातून ठाकरे यांनी सैरभैर व्हावे, अशी हितशत्रूंची अपेक्षा असेल. त्यामुळे हा धोका ठाकरे यांनी लक्षात ठेवावा. त्यांची पुढची वाटचाल संयमित व सहज असावी हीच अपेक्षा', अशा शब्दांत जयंती अलूरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या आगामी वाटचालीविषयी सल्ला दिला आहे. 'उद्धव ठाकरेंनी कंबर कसायला हवी' एकीकडे पुढील दोन वर्षांचा काळ उद्धव ठाकरेंसाठी त्रासदायक असल्याचं सांगतानाच टॅरो कार्डरीडर जयंती अलूरकर यांनी त्यांच्यासाठी Wheel of Fortune या कार्डमधील भाकित वर्तवले आहे, 'काही गेले अथवा संपले म्हणून जगरहाटी थांबत नाही. हे कालचक्र आहे. गोष्टींकडे ज्याप्रमाणे मनुष्य पाहतो त्याचप्रमाणे त्या, त्याच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे शून्यातून जग निर्माण करण्यासाठी कंबर कसायला हवी आहे. दोषारोप करत बसण्यात फक्त वेळ वाया जाईल, हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे कंबर कसून कामाला लागा', असा सल्लाही या कार्डच्या मदतीने जयंती अलूरकर यांनी दिला आहे.