आयुक्तालयात दिवसभर चर्चा औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाल्याच्या संदर्भाने गुरुवारी दिवसभर येथील मुख्यालयात चर्चा सुरू होती. प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता चर्चा आपण पण ऐकत आहोत, पण अद्याप हातात नियुक्ती आदेशाची प्रत पडली नसल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. औरंगाबाद शहरात मार्च महिन्यात मिटमिटा येथे कचरा टाकण्याच्या प्रश्नावरून उसळलेल्या दंगलीनंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. यादव यांनी तेव्हाच आपण पुन्हा येथे येण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले होते. सुमारे दोन महिने शहराचा कारभार प्रभारी पोलीस आयुक्तांवर सुरू आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सध्या पदभार आहे. जुन्या औरंगाबाद शहरातील शहागंज, संस्थान गणपती, राजाबाजार आदी भागात ११ मे च्या मध्यरात्री दोन गटातील वादामुळे मोठय़ा प्रमाणातील हिंसाचाराची घटना घडली होती. कोटय़वधींचे नुकसान झाले. अनेकांची दुकाने, घरे, चारचाकी, दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली. काही घरे जमीनदोस्त झाली. हिंसाचार थांबवण्यात पोलीस प्रशासन कमी पडले, असाही सूर उमटला. घटनेपूर्वी काही तास अगोदरच प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे मुंबईत हिमांशू रॉय यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. दोन पोलीस उपायुक्त रजेवर गेले होते. त्यामुळे एका उपायुक्तासह तीन सहायक पोलीस आयुक्तांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना हिंसाचार थांबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यातही सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले. दोन पोलीस निरीक्षकांसह काही कर्मचारी जखमी झाले. या पाश्र्वभूमीवर दोन्ही गटांकडून पोलीस हिंसाचार रोखण्यात कमी पडल्याचा आरोप होऊ लागला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची काही लोकप्रतिनिधींनी मुंबईत भेट घेऊन औरंगाबादला कायमस्वरूपी पोलीस आयुक्त देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसात औरंगाबादला पोलीस आयुक्त मिळेल, असे आश्वासन लोकप्रतिनिधींना दिले होते. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयात चिरंजीव प्रसाद यांच्या नावाची चर्चा होती. प्रसाद यांनी २००२ ते २००४ या काळात औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. येथील सेवेचा त्यांना अनुभव आहे. अद्याप नियुक्तीपत्र नाही औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होत असल्याची चर्चा आपल्यापर्यंतही आलेली आहे. मात्र अद्याप नियुक्तीचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. नियुक्ती झाली तर औरंगाबादला चांगले प्रशासन देऊ. - चिरंजीव प्रसाद.