बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकमताचा अनादर केला आहे. त्यांनी नव्याने निवडणुकांना सामारे जावे, असे मत स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केले. स्वामी अग्निवेश हे संयुक्त जनता दलाचे सदस्य आहेत. नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य करून त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. ‘भाजपची साथ घेऊन नव्याने मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा निर्णय अयोग्य आहे, त्या विरोधात पक्षात संघर्ष करू,’ असे ते म्हणाले. असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना किमान वेतन मिळायला हवे, याची जागृती करण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. या जनजागृतीचा भाग म्हणून ते औरंगाबाद येथे आले होते. नितीशकुमार यांनी घेतलेला निर्णय लोकशाहीच्या विरोधातला आहे. केवळ अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजकीय व्यक्तीने निर्णय घ्यायचे नसतात, तर लोकमताच्या आधारे नेतृत्वाला निर्णय घेणे आवश्यक असते. नितीशकुमार यांनी केले नाही, असे अग्निवेश यांनी सांगितले. राष्ट्रवादाची व्याख्या खुजी बनवली जात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वेतन आयोगाशी किमान वेतन जोडावे सातव्या वेतन आयोगात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जेवढा पगार मिळतो, ते मजुरांसाठीचे किमान वेतन देशभर केले जावे, अशी मागणी त्यांनी केली. नव्यानेच सर्व राज्यांमध्ये एकच एक किमान वेतन असावे, असा कायदा सरकारने मंजूर केला आहे. त्याचे स्वागत करतो, मात्र ही रक्कम ठरवताना सातव्या वेतन आयोगातील निकषाचा आधार घेतला जावा, असेही ते म्हणाले.