|| सुहास सरदेशमुख

बनावट कोटेशनची क्लृप्ती; सुमारे साडेसहा हजार कोटींची कर्जे धोक्यात

देशातील बँकांना नजिकच्या भविष्यात मुद्रा योजनेद्वारे दिलेली कर्जे भोवू शकतात, असा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी नुकताच दिल्यानंतर त्याची प्रचीती औरंगाबाद जिल्ह्य़ात येऊ लागली आहे. ‘मुद्रा’ योजनेद्वारे निव्वळ बनावट कोटेशनच्या आधारे कर्ज घ्यायचे, पण ना उद्योग थाटायचे ना कर्जफेड करायची, असा घातक पायंडा पडला असून विविध बँकांकडून दिली गेलेली सहा हजार ४४१ कोटी रुपयांची कर्जे थकीत होण्याची भीती आहे. बनावट कोटेशन देणाऱ्या ३० जणांचा शोध बँकांना लागला आहे.

अर्थात केवळ ३० प्रकरणांमध्ये अशा त्रुटी दिसल्या असल्या तरी अनेक ठिकाणी याची पाहणी न करताच ‘मुद्रा’तून कर्ज वितरित झाले असल्याने या योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात ३० मार्च २०१७ पर्यंत एक लाख ५१ हजार २१ लाभार्थ्यांना ८०१ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज दिले गेले. एप्रिल ते सप्टेंबर २०१८ पर्यंत हा आकडा ३०८ कोटी सात लाख रुपयांचा आहे. म्हणजे ११०९ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज औरंगाबाद जिल्ह्य़ात देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्य़ातला हा आकडा वाढतो आहे. मात्र, उद्योग काही उभारले जात नाहीत. असे का होते, याचा शोध घेताना बँकेतील अधिकाऱ्यांनी बनावट कोटेशनच्या प्रकारांवर बोट ठेवत त्यांचे नमुनेच सादर केले.

औरंगाबाद शहरातील नारळीबाग येथे यश एंटरप्रायजेसचे कोटेशन या गोरखधंद्यावर प्रकाश टाकणारे आहे. कापडी शामियानासाठी या व्यावसायिकाने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला दोन लाख ४० हजार रुपयांचे कोटेशन दिले. याच दुकानातून अन्य एका उद्योगोच्छुक (!) व्यक्तीला शिलाई मशिनचे आठ लाख ५० हजार रुपयांचे कोटेशन दिले गेले. नारळीबागेतील या दुकानाची पाहणी केली असता, तेथे तीन लोखंडी कपाटे, दोन खुच्र्या एवढेच साहित्य होते. या अनुषंगाने यश एंटरप्रायजेसच्या मालकाला विचारता ते म्हणाले की, ‘बऱ्याचदा वेगवेगळे नेते कोरे कोटेशन द्या, अशी मागणी करतात. आम्हाला ती द्यावी लागतात.’ पण यातील एक कोटेशन आमचे आणि दुसरे आमचे नाही, असा दावाही त्यांनी केला. असे केवळ एक उदाहरण नाही. औरंगाबादेतील हडकोतील पूजा कलेक्शन, राजाबाजारमधील रामकृष्ण एंटरप्रायजेस येथूनही असे बनावट कोटेशन दिले गेले असल्याचा संशय बँकेच्या अधिकाऱ्यांना आहे. औरंगाबाद येथील ही उदाहरणे बहुतांश राज्यात लागू आहेत. सर्वत्र अशाच पद्धतीने मुद्रा कर्ज दिले असण्याची शक्यता आहे. मात्र, योजनानिहाय अशी तपासणी करण्याची कोणतीही पद्धत अस्तित्वात नसल्याने सर्वाचे फावते आहे. कर्ज घेणाऱ्यांचा आकडा फुगलेला आणि कर्जाचा आकडाही वाढत जाणारा, अशी मुद्रा योजनेची स्थिती आहे. या योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देता येऊ शकते. उद्योग थाटायचा नाही, फक्त कर्ज उचलायचे आणि ते परत फेडायचेच नाही, अशा मानसिकतेत असणाऱ्यांनी योजनेतून लूट सुरू केली असल्याने योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. मोठय़ा उद्योगाच्या अनुत्पादक कर्जाची चिंता देशभर सुरू असताना छोटे कर्ज मिळविण्यासाठीही टोळ्या कार्यरत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा उद्योग केंद्रातून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबत दबावगट निर्माण केला जातो, अशी उपोषणे करणाऱ्यांचीही एक टोळी कार्यरत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र या औरंगाबाद जिल्ह्य़ातील अग्रणी बँकेचे अधिकारी सांगतात.

एकीकडे असा अनागोंदी कारभार सुरू असताना मुद्रा अंतर्गत कर्ज मिळत नाही, अशी तक्रार आमदार आणि खासदारही वेगवेगळ्या बैठकांमधून करत असतात. अलिकडेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुद्रा लोनवरून आमदारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बराच गोंधळ घातला होता.

‘सिमेंट-काँक्रीट’ मिक्सर विकणारा ‘किराणा’ दुकानदार!

किराणा दुकानात कधी सिमेंट-काँक्रीटचे मिक्सर विकत मिळेल का? किंवा असे बांधकाम साहित्य विकणारा मोठा उद्योजक किराणा मालाचे दुकान टाकेल का? ‘मुद्रा’ कर्जासाठी मात्र काही जणांनी असेही कोटेशन दिले होते. अर्थात ते अमान्य झाले. औरंगाबाद येथील सिडको येथील श्रीगणेश सुपर मार्केट या नावाने ज्या पत्त्यावरून कोटेशन देण्यात आले, त्याच पत्त्यावर श्री गणेश एंटरप्रायजेसचेही दुकान आहे. कर्जासाठीचे पहिले कोटेशन पाच लाखांचे आहे, तर किराणा मालाचे कोटेशन ५० हजारांचे. यामुळे कर्ज घेणारा खरा, की त्यांना माल देणारा खरा, असे प्रश्न उपस्थित झाले. शिवानी एंटरप्रायजेसमधून मिरची ग्राइंडर मशीनचे ५० हजारांचे कोटेशन दिले गेले, त्याच एंटरप्रायजेसमधून केश कर्तनालयासाठी लागणाऱ्या साहित्याचीही विक्री होते, अशी कागदपत्रे कर्ज प्रकरणाला जोडण्यात आली.

योग्य लाभार्थ्यांना कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, अलीकडे कर्जासाठी बनावट कोटेशन देणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. असे ३० जण आम्ही शोधले आहेत. प्रत्यक्षात एखाद्या व्यवसायाशी अजिबात संबंध नसलेल्या व्यक्ती, त्या उद्योगाला लागणारा माल आम्ही पुरवणार आहोत, असे कळवतात आणि कर्जाची मागणी करतात. त्यामुळे योजनेवर परिणाम होतो.    – प्रदीप कुतवळ, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक

कर्जाचाच उद्योग!

  • गाजावाजा करत आणलेल्या मुद्रा योजनेची व्याप्ती किती? राज्यात एप्रिल ते आजतागायत १२ लाख ८२ हजार ६६९ लाभार्थ्यांना सहा हजार ४४१ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले.
  • पण त्यातून उद्योग किती उभारले, हे सांगता येत नाही. कारण कर्ज घेताना बोगस कोटेशन देणाऱ्यांची टोळीच जिल्हा-जिल्ह्य़ात कार्यरत आहे.
  • कोणत्याही मालाची विक्री न करता केवळ कोटेशन लिहून देणाऱ्यांनी अनेक प्रताप केले आहेत. ज्या दुकानातून शेवया, पापड, लोणची बनविणारी यंत्रे विकली जातात, त्याच दुकानातून मंडप साहित्यही पुरवले जात असल्याचे कोटेशन देत ‘मुद्रा’द्वारे कर्ज घेतले गेल्याचे प्रकार उघड होत आहेत.