गर्दीने फुललेला मंडप, खेडय़ा-पाडय़ांमधून विवाहस्थळी येणारे वऱ्हाडी मंडळींचे जथ्थे आणि अलोट जनसमुदायाच्या साक्षीने नव वधू-वरांच्या बांधलेल्या रेशीमगाठी अशा वातावरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी येथे पार पडला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा पहिलाच सोहळा घेण्याचा मान परभणीला मिळाला. यात तब्बल ३३३ जोडपी विवाहबद्ध झाली. ‘तुम्ही दिलेली सत्तेची ताकद तुमच्या चरणी समर्पित करण्यास आलो आहे’, असे उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी काढले.
परभणीच्या इतिहासात हा सोहळा अपूर्व व अद्वितीय ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याच्या आयोजनासाठी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील होते. गावोगावी या सोहळ्याची निमंत्रणे देण्यात आली. सकाळपासूनच वऱ्हाडी मंडळी दाखल होण्यास प्रारंभ झाला. वाहनांचे जथ्थे विवाहस्थळी येऊ लागले. लग्नाचा मुहूर्त दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी होता. पण, त्याआधीच विवाह मंडप गर्दीने तुडुंब भरला. जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात उभारलेल्या मंडपात एक तास आधीच पाय ठेवायलाही जागा नव्हती. शहराच्या सर्व बाजूंनी वऱ्हाडी मंडळी शेवटपर्यंत मंडपाकडे दाखल होत होती. त्यामुळे रस्ते चहुबाजूंनी गर्दीने फुलून गेले. मंडपाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांची रीघ लागल्याने वाहतुकीत मोठा खोळंबा निर्माण झाला.
मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंनी वधू-वरांसाठी भव्य व्यासपीठ उभारले होते. दुपारी एकनंतर उद्धव ठाकरे यांचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह आगमन झाले. आयोजक खासदार जाधव, आमदार डॉ. पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे, संपर्कप्रमुख आमदार सुभाष भोईर, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार जयप्रकाश मुंदडा, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, हरिभाऊ लहाने, मिराताई रेंगे, शेतकरी संघटनेचे लक्ष्मण वडले, महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते. प्रारंभी बौद्ध वधू-वरांचे विवाह विधिवत पार पडले. यानंतर मंगलाष्टकांच्या निनादात सोहळा पार पडला. वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थितांनी प्रचंड गर्दी केली होती.
सत्तेची ताकद जनतेच्या चरणी- उद्धव ठाकरे
निवडणुकीत मते मागण्यासाठी आम्ही दारोदार जातो. लोक मते देतात, पण मतदान झाल्यानंतर तुमची-आमची ओळखच नाही, असे चित्र दिसून येते. ही राजकारणातील परंपरा मोडायची आहे. अशी परंपरा चुलीत टाकून तुम्ही दिलेली सत्तेची ताकद तुमच्याच चरणी अर्पण करण्यास आलो आहोत, असे उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. विवाहस्थळी आल्यानंतर ठाकरे यांनी अवघ्या चार मिनिटांच्या भाषणात कोणत्याही राजकीय मुद्याला स्पर्श केला नाही. कुठलेही राजकीय विधान करण्याऐवजी वधू-वरांना शुभशीर्वाद देत भावना व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात, याची आता चर्चा करण्यापेक्षा किंवा दुखाची कोणतीही गोष्ट करण्यापेक्षा केवळ तुमच्या पाठीशी शिवसेना खंबीर आहे हे सांगण्यासाठीच आपण आलो. आम्ही सर्वजण तुमचे कुटुंबीय बनून तुमच्यासोबत राहू. संकटे येतात जातात. संकटांचा मुकाबला आपण सगळे मिळून करू. आत्महत्येनंतर शेतकऱ्याचे कुटुंब उघडय़ावर पडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता कितीही संकटे आली, तरी परिस्थितीला धीराने तोंड दिले पाहिजे. संकटात दुसरे कोणी मदतीला येईल की नाही माहित नाही, पण शिवसेना नक्कीच तुमच्यासोबत असेल. दुष्काळात धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही जे आशीर्वाद दिले ते सर्व तुमच्यासाठीच वापरू. तुमच्याच रूपात माझा देव आहे असेही ठाकरे यांनी सांगितले. देसाई, भोईर यांचीही भाषणे झाली.
विराट जनतेला सलाम- खासदार जाधव
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परभणीनेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली. अशा बालेकिल्ल्याला कन्यादान योजनेतील पहिला सामुदायिक विवाहसोहळा घेण्याचे भाग्य लाभले. या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल परभणीकरांना सलाम. जनतेने प्रचंड गर्दीत हा सोहळा ऐतिहासिक केला, याबद्दल या जनसमुदायाला त्रिवार अभिवादन, अशी भावना खासदार जाधव यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Feb 2016 रोजी प्रकाशित
ठाकरे कन्यादान योजनेत ३३३ जोडपी विवाहबद्ध
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा पहिलाच सोहळा घेण्याचा मान परभणीला मिळाला. यात ३३३ जोडपी विवाहबद्ध झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-02-2016 at 01:30 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 333 couple married