औरंगाबादमधील समर्थनगर परिसरात असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन तब्बल २७ कोटी रुपयांचे ५८ किलो सोनं लांबवल्या प्रकरणी शाखेचे व्यवस्थापक अंकुर राणेसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्वनाथ प्रकाश पेठे यांनी येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शाखा व्यवस्थापक अंकुर राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ही जबरी चोरी झाल्याचं सांगण्यात येत असून, या गुन्ह्याची नोंद आज झाली आहे. मालकास व्यवस्थापकावर चोरीचा संशय होता मात्र तो उडवा उडवीची उत्तर देत होता. अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला व त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. व्यवस्थापकाने गुन्हा केल्याचे मान्य केले आहे.

याप्रकरणी दिलेल्या तक्रारीत विश्वनाथ पेठे यांनी म्हटेल आहे की,  औरंगाबादेतील सर्मर्थनगर शाखेसाठी आम्ही अंकुर अनंत राणे यांची पहिल्या दिवसापासून व्यवस्थापक म्हणुन  नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे शाखेचा सर्व हिशोब पाहण्याबरोबर ग्राहकांशी संबंध वृद्धिंगत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आमच्या लेखी परवानगी शिवाय  दुकानातील कुठलाही माल कोणत्याही ग्राहकास उधारीवर विक्री करण्याची अथवा दुकानाबाहेर कोणत्याही कामासाठी पाठवण्याचे अधिकार व्यवस्थापक अंकुर राणे किंवा अन्य कोणालाही दिलेले नाहीत.  नोव्हेंबर २०१८ च्या शेवटी मी औरंगाबाद शाखेस भेट दिली होती. त्यावेळी मला दुकानातील  माल कमी असल्याचे जाणवल्याने मी याबाबत व्यवस्थापक अंकुर राणे यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी त्यावेळी सांगितले की, कमी भरत असलेल्या ५८ किलो सोन्याच्या दागिन्यांचा माल मी तपासणीसाठी राजेंद्र जैन त्यांच्या पत्नी भारती जैन व त्यांचा भाचा लोकेश जैन  यांना दिला आहे. शिवाय ते हा माल लवकरच परत करणार असल्याचेही सांगून त्याने वेळ मारून नेली होती. यानंतर एप्रिल २०१९ मध्ये देखील स्टाॅक कमी असल्याचे समोर आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता सुरूवातीस त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र नंतर  राजेंद्र जैन, भारती जैन व  लोकेश जैन यांच्याशी संगनमत करून एकुण सोन्याच्या रक्कमेच्या २५ टक्के हिश्शाच्या अमिषाने आपण हा फेरफार केल्याचे त्याने मान्य केले.

अंकुर राणे याने ईमेल करून मी राजेंद्र जैन, भारती जैन व लोकेश जैन यांनी संगनमताने गुन्हा केलेला आहे, दुकानातील चोरीस गेलेला माल २० जुन २०१९ पर्यंत आणुन देतो असे कळवले होते. तसेच दुकानाती ५८ किलो सोन्याचे दागिने चोरून वरील सर्वांनी त्याची कोठेतरी विक्री केली आहे.  चोरलेल्या दागिन्यांची त्यांनी  खोटी बिलं तयार तयार करून त्याच्या खोट्या नोंदी घेत ती खरी असल्याची भासवत आमची २७ कोटींची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले असून या आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे.