छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती आणि वाढत जाणारी शेतकऱ्यांच्या आर्थिक ओढाताणीतून ऑगस्ट महिन्यात ९९ आत्महत्या झाल्या आहेत. दर महिन्याला शंभरी गाठणारा आत्महत्यांचा आकडा आता प्रशासनाकडून सराईतपणे शासन दरबारी सादर केला जातो. त्यावर उपाययोजना करण्याचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेला अहवाल तर राज्य सरकारने स्वीकारला आहे का, हेही कळू शकलेले नाही. जानेवारीपासून आतापर्यंत ६८५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील ४८५ आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीपणातून झाल्या असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

मराठवाडय़ातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून मका हातचा गेला आहे. पीक विम्यातील २५ टक्के रक्कम अग्रीम स्वरुपात देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, याच काळात पुन्हा आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ात ऑगस्टमध्ये सर्वाधिक ३१ आत्महत्या झाल्या. गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे सत्र सुरूच असले तरी त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. माजी विभागीय आयुक्तांनी मराठवाडय़ातील समस्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण केले. शासकीय यंत्रणेने केलेल्या या सर्वेक्षणात काही चुका असतील, असे गृहीत धरले तरी आतापर्यंत शासन दरबारी सादर करण्यात आलेला आत्महत्यांचा आकडाही मराठवाडय़ातील गंभीर स्थिती सांगण्यास पुरेसा असल्याचे म्हटले जाते. २०१२ ते २०२२ या कालावधीमध्ये मराठवाडय़ात आतापर्यंत ८ हजार ७१९ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. या आत्महत्यांचे विश्लेषणही करण्यात आले असून, त्यापैकी नापिकीमुळे ९२३, कर्जबाजारीपणामुळे १ हजार ४९४ तर नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ४ हजार ३७१ तर दुहेरी कर्जामुळे १ हजार ९२९ आत्महत्या झाल्या आहेत.