देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या लोकशाहीमार्गाच्या चळवळी, विद्रोह, आंदोलने केंद्र सरकार देशद्रोहाच्या नावाखाली संपविण्याचा कट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केला.
बीड येथे बारा बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्तांची आत्मसन्मान परिषद घेण्यात आली. या वेळी भटक्या विमुक्त महासंघाचे अध्यक्ष हरीभाऊ राठोड, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, प्रकाश पोहरे, गुलाब चव्हाण, प्रा. पी. टी. चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी बोलतांना क्षीरसागर म्हणाले की, देशात सत्तांतर झाल्यानंतर मागील दीड वर्षांपासून जाती-पातीद्वारे समाज वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सर्व ओबीसी वर्गानी एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. ओबीसींना २७ टक्के केंद्राचे आरक्षण आहे. देशात लोकसंख्या मात्र ५२ टक्के आहे. त्यामुळे लाभार्थी सुविधांपासून वंचित राहत आहेत. न्याय्य हक्कांसाठी देशात लोकशाहीमार्गाने सुरू असलेल्या चळवळी, विद्रोह, आंदोलने देशद्रोहाच्या नावाखाली संपविण्याचा कट सरकारने रचला असल्याचा आरोप करुन संघर्षांचा रेटा वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर हरीभाऊ राठोड यांनी ओबीसींचे हक्क पदरात पाडून घेण्यासाठी २७ मार्च रोजी दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा दिला. कल्याणराव दळे यांनी आजही छोटय़ा छोटय़ा जातीतील लोक दारिद्रय़रेषेचे जीवन जगत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2016 रोजी प्रकाशित
‘देशद्रोहाच्या नावाखाली चळवळी संपवण्याचा कट’
लोकशाहीमार्गाच्या चळवळी, विद्रोह, आंदोलने केंद्र सरकार देशद्रोहाच्या नावाखाली संपविण्याचा कट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-03-2016 at 02:35 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atmasanman parishad in beed