औरंगाबाद :अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपतर्फे मराठवाडय़ात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद, हिंगोली, लातूर व उस्मानाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. औरंगाबाद येथे जिल्हाध्यक्ष संजय कनेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, तर आमदार अतुल सावे यांनी सक्त वसुली संचालनालयाने मलिक यांच्यावर का कारवाई केली याची माहिती पत्रकार बैठकीत दिली. लातूर येथे आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसने सक्त वसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईच्या विरोधात जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन केले. उस्मानाबादमध्येही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नवाब मलिक यांचे देशद्रोही कारवाया करणाऱ्या व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे झालेली कारवाई योग्य असल्याचा दावा आमदार अतुल सावे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार बैठकीत केला. या वेळी जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता यांची उपस्थिती होती. परभणीमध्येही आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी येथे केली. मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने मलिक यांच्या अटकेचा निषेध केला असून पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात आले. अटकेची कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असून त्यासाठी जी प्रक्रिया अवलंबविण्यात आली ती निंदनीय आणि सूडबुद्धीची असल्याचे या निवदेनात म्हटले आहे. जिल्हा उपाध्यक्ष शेख इनायतुल्ला, जिल्हा शहराध्यक्ष रहेमान खान पठाण आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. लातूरमध्येही राजीनाम्याच्या मागणीचा जोर महाविकास आघाडी सरकार दाऊद समर्थक असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेस लातूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, लातूर शहर भाजप अध्यक्ष गुरुनाथ मगे आदी उपस्थित होते. दाऊद इब्राहिमच्या हस्तकामार्फत मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचे सज्जड पुरावे जमा झाल्यानंतरच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. मात्र असे असतानाही राज्यातील आघाडी सरकार मधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सर्व मंडळी मलिक यांचे समर्थन करत आहेत. याचाच अर्थ हे सरकार दाऊद समर्थक असल्याचा आरोप संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केला.