छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर अहिल्या कुंड येथील ध्वनी व प्रकाश प्रकल्प पूर्ण झाला आहे. वारंवार हा प्रकल्प ताब्यात घ्या, अशी विनंती बेसिल कंपनीकडून जिल्हाधिकाऱ्यांना केली जात आहे. मात्र, या प्रकल्पाचा दर महिन्याचा दोन लाख रुपयांचा खर्च करायचा कोणी आणि कसा, हा पेच असल्याने जिल्हा प्रशासन पुढची पावले उचलण्यास तयार नसल्याची बाब समोर आली आहे. डॉ. भागवत कराड यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ही बाब समोर आल्याचे सोमवारी पत्रकार बैठकीत सांगण्यात आले.
अहिल्याबाई होळकर यांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचावी म्हणून घृष्णेश्वर मंदिरासमोरील अहिल्या कुंड परिसरात ७.५० कोटी रुपयांतून रोषणाईसह १७ मिनिटांचा ध्वनी प्रकल्प पूर्ण करण्यात आला. बेसिल कंपनीकडून करण्यात आलेल्या या प्रकल्पात तीन एकराला संरक्षण भिंत, सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय अशा सुविधा आहेत. हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून खासदार डॉ. कराड यांनी पाठपुरावा केला होता. प्रकल्प तर पूर्ण झाला. दोन वेळा त्याचे खेळही झाले. त्याला शंभरहून अधिक व्यक्तींची उपस्थिती हाेती. मात्र, आता हा प्रकल्प चालवायचा कोणी आणि कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, ध्वनी व प्रकाश प्रकल्पातील दोन ध्वनिक्षेपक चोरीस गेल्यानंतर तहसीलदारांनी पोलिसांमध्ये फिर्याद द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने या विषयावर योग्य मार्ग काढला जाईल, असे सांगण्यात आले.