औरंगाबादच्या पर्यटन व्यावसायिकांचा मंत्र्यांना प्रश्न औरंगाबाद : जागतिक पर्यटनाचा वारसा असणाऱ्या वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद ठेवणे हा पर्यटन व्यवसायावर अन्याय करणारी बाब आहे. बंद खोलीतील व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेवर सुरू ठेवल्या जातात आणि खुल्या वातावरणातील लेणींना मात्र बंदी घातली जाते, हे निर्बंधांचे तर्कशास्त्र न उमजण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन क्षेत्रातून उमटत आहे. या आशयाचे पत्रही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. वेरुळ, अजिंठय़ासह पर्यटन स्थळे बंद करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्यानंतर सोमवारी पर्यटनस्थळी शुकशुकाट होता. औरंगाबादसारख्या ठिकाणी पर्यटनावर हजारो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. लेणी दाखवणारे व माहिती सांगणारे वाटाडे (गाइड) लेणी परिसरात खाण्याच्या वस्तू, गळय़ातील माळा, टोप्या, शीतपेयांची दुकाने, पाणी विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक रिक्षाचालक यांचा व्यवसाय अडचणीत आले असल्याचे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुनील कोठारी यांनी आदित्य ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे आदी बंदिस्त जागेत चालणाऱ्या व्यवसायाला ५० टक्के संख्येची मर्यादा आणि हवेशीर वातावरणात पाहता येऊ शकणाऱ्या लेणींवर बंदीचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.