छत्रपती संभाजीनगर : अपघातानंतर मृत्यू ओढावण्याचे प्रमाण मागील २५ वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे. २००० साली अपघातानंतर मृत्यूचे प्रमाण २० टक्के होते. आता ते ३६ टक्के झाले आहे. शहरापासून दुरून होणारे महामार्ग, त्यावरील सुसाट वाहतूक आणि अपघातानंतर वेळेत तज्ज्ञांअभावी उपचार न मिळणे, अशी काही प्रमुख कारणे मृत्यूचा दर वाढण्यामागे आहेत, अशी माहिती येथे देण्यात आली.
येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित पत्रकार बैठकीत ट्राॅमा केअरशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर देताना असोसिएशन ऑफ सर्जन्सचे अध्यक्ष डाॅ. प्रवीण सूर्यवंशींसह उपस्थित डाॅक्टरांनी वरील माहिती दिली. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या वतीने ८ ते १५ जून दरम्यान ‘सर्जन्स वीक’ देशभर साजरा करण्यात येणार असल्याचे सांगत असताना वरील माहिती देण्यात आली.
यावेळी २०२० पर्यंत लोकसंख्येच्या ६० टक्के डाॅक्टर्स हे आयुषमधीलच असल्याचे सांगण्यात आले. तसेच २०२० पर्यंत लोकसंख्येच्या सतराशे लोकांमध्ये एक एमबीबीएस व त्यापुढील शिक्षण घेतलेले डाॅक्टर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मागील दहा वर्षांत अडीच पट वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या असून, एक लाख लोकसंख्येमागे १० ते १५ शल्यचिकित्सक हवे असताना केवळ १ ते ५ एवढेच शल्यचिकित्सक असल्याची माहिती देण्यात आली.
१५ जून रोजी समारोप दरम्यान, सर्जन्स वीकमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, जनजागृती मोहिमा, मोफत शस्त्रक्रिया, सार्वजनिक व्याख्याने, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी १५ जून रोजी राष्ट्रीय सर्जन्स तर १४ जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. एएसआयच्या संस्थेशी संबंधित सर्जन्स वीकचा समारोप सोहळा १५ जून रोजी रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, या कार्यक्रमास एएसआयचे पाच माजी अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती डाॅ. सूर्यवंशी यांनी दिली.