छत्रपती संभाजीनगर : धाराशिवजवळील बावी गावातील एका २९ वर्षीय तरुणाने कर्जबाजारी झाल्याच्या नैराश्यातून पत्नी, दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मण मारुती जाधव, तेजस्विनी व त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. लक्ष्मण जाधवने पत्नी तेजस्वीनी व मुलाला विष पाजले व नंतर स्वत: गळफास लावून घेतला. सकाळी बराचवेळा घरातून आवाज येत नसल्याने ही घटना उघडकीस आली. लक्ष्मणने गावातील तेजस्वीनीसोबत तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. बदली चालक म्हणून लक्ष्मण काम करत होता. लग्नानंतर लक्ष्मण आई-वडिलांपासून दूर शेतशिवारात राहत होता.
अलीकडे तो ऑनलाईनच्या खेळात कर्जबाजारी झाला होता. त्यातूनच त्याने एक एकर जमीन व प्लाॅटिंगची जागाही विक्री केली होती. शेजारच्यांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत लक्ष्मणच्या घराचे दार उघडले नसल्याने त्यांनी गावातील महत्त्वाच्या मंडळींना सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी भेट देऊन पाहणी केली.