सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : वळण नावाच्या गावातील ज्ञानेश्वर पवार यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. तीन एकरांत लावलेला मका करपून गेला आहे. कापसाची वाढ झालीच नाही. दोन सावकारांचे लाख-सव्वा लाखाचे देणे बाकी आहे. बियाणांची उधारी प्रत्येक हंगामात वाढती आहे. जगणे मुश्कील झाले आहे.

मराठवाडय़ात जगण्या-मरण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची संख्या एक लाख पाच हजार आहे. ७५४ कुटुंबे अतिसंवेदनशील श्रेणीतील आहेत, तर दोन लाख ९८ हजार ५१ कुटुंबे संवेदनशील श्रेणीत मोडतात. शेतीच्या अधोगतीचा अहवाल बाजूला सारून १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर विकासाचे नवेच प्रस्ताव पुढे आणले जात आहेत. त्याऐवजी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची मागणीही होऊ लागली आहे.

हेही वाचा >>>दुष्काळाचा पहिला फटका मुलांच्या शिक्षणाला; शिकवणी शुल्क भरताना कसरत, अनेक विद्यार्थी गावी परतले

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केलेले हे सर्वेक्षण सुनील केंद्रकर यांच्या अहवालाचा भाग होते. पण तो अहवालच राज्य सरकारने गुंडाळून ठेवला. मात्र दुष्काळामुळे पुन्हा या कुटुंबांची अवस्था बिकट बनल्याचे दिसून येत आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अवगत केल्यानंतर स्वेच्छा सेवानिवृत्तीचा मार्ग स्वीकारावा लागणारे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी केलेल्या शिफारशी राज्य सरकारमधील वरिष्ठांना आवडल्या नाहीत. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. या अहवालातील निरीक्षणे मराठवाडय़ातील शेतीविषयक परिस्थितीची अधोगती सांगणारा आहे.

‘२०१२ ते २०२२ या कालावधीमध्ये ८ हजार ७१९ जणांनी आत्महत्या केल्या. त्यातील ९२३ आत्महत्या नापिकीमुळे, १४९४ आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे, तर नापिकी व कर्जबाजारीपणाच्या एकत्र परिणामातून ४ हजार ३७१ तर कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे १ हजार ९२९ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली,’ असे निरीक्षण या अहवालात सर्वेक्षणाच्या आधारे नोंदविण्यात आले होते.

हेही वाचा >>>मराठवाडय़ात ऑगस्ट महिन्यात ९९ आत्महत्या; दुष्काळ, नापिकीचे परिणाम

‘आयुक्तांच्या शिफारशी सरकारला आवडल्या नसतील कदाचित अथवा त्या अंमलबजावणीत आणणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसेलही, पण त्यामुळे त्यांनी केलेल्या नोंदी चूक कशा ठरतील, असा प्रश्न महराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. राजन क्षीरसागर हे विचारतात.

हे सर्वेक्षण दुष्काळापूर्वीचे आहे. त्यात पुन्हा भर पडत आहे. सर्वेक्षणाच्या यादीत ज्ञानेश्वर पवार यांचे नाव संवदेनशील श्रेणीत नोंदले गेले होते. आता परिस्थिती अजून बिकट झाली आहे. ज्ञानेश्वर पवारसारख्या शेतकऱ्यांना आता दररोज घर कसे भागवावे याची चिंता वाटू लागली आहे.

मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत समस्या मोठी गंभीर बनली आहे. दुष्काळामुळे हैराण झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत. जगण्याची भ्रांत कशी निर्माण होते? आशाबाई सूर्यवंशी यांच्या वाटय़ाला आलेल्या दीड एकरात लावलेला मका आज- उद्या करपून जाईल. दोन तरुण मुलांमध्ये जेसीबी चालविण्याचे कसब असूनही दुष्काळातील सारे व्यवहार ठप्प झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यवहार ठप्प..

रोजगार हमीमध्ये कामे मिळतील पण त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे दुष्काळी मराठवाडय़ात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गावोगावी आता सावकारांची चलती आहे. आता कोणी कीटकनाशके आणत नाही की खताची गोणी. पाऊस नसल्याने शिवार सुन्न पडले आहे, पावसाची वाट पाहत.