दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघालेल्या मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देतानाच आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून औरंगाबादच्या १०९ व जालना जिल्ह्य़ातील २६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाणार आहे.
सोमवारी (दि. ७) दुपारी १ वाजता येथील सिडको नाटय़गृहात पाटेकर व अनासपुरे यांच्या हस्ते या दोन जिल्ह्य़ांतील १३५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मागील ३-४ वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाच्या चक्रात होरपळत आहे. सततच्या नापिकीने शेतकरी चांगलाच त्रस्त झाला आहे. मागील दोन वर्षांत औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत जवळपास १३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला पाटेकर व अनासपुरे धावून आले आहेत. नुकतीच बीड, लातूर, व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत केली. आता सोमवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाणार असल्याची माहिती संयोजक चंद्रकांत मोरे यांनी दिली. नांदेडमध्ये ७१, परभणी २१, हिंगोली ११ या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. बीडमधील ११२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वीच आर्थिक मदत देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2015 रोजी प्रकाशित
औरंगाबाद-जालन्यातील शेतकरी कुटुंबीयांना उद्या मदत
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धीर देतानाच आर्थिक मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतला आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 06-09-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help to aurangabad jalna farmers tomorrow