छत्रपती संभाजीनगर : मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाच महिन्यांपासून फरार आहे. मात्र, त्याचे मित्र त्याच्या संपर्कात आहेत. ती मंडळी गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याने त्यांच्यापासून जिवास धोका असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले. सरपंच हत्या प्रकरणाची आज होणारी सुनावणी २४ जूनला होईल, असे न्यायालयीन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. तो त्याच्या काही मित्रांच्या संपर्कात असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. मात्र, त्याला अटक होत नसल्याने कुटुंबीयांस धोका आहे. तसेच बीडच्या कारागृहातही हत्या प्रकरणातील सर्व एकत्र आहेत. त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या कारागृहांत ठेवावे, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.
कृष्णा आंधळे याचा हत्येमध्ये असणारा संबंध लक्षात घेऊन त्यास लवकर अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली कराव्यात, अशी मागणीही केली जात आहे.